आशिष शेलारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्‍यासाठी महामृत्‍युंजय मंत्र पठण | पुढारी

आशिष शेलारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्‍यासाठी महामृत्‍युंजय मंत्र पठण

मुंबई ; पुढारी ऑनलाईन

पंजाबमधील रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत (Prime Minister Security) मोठी त्रूटी राहिल्याने रद्द करण्यात आली होती. आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना १५ ते २० मिनिटं उड्डाण पुलावर थांबावं लागलं होतं. मोदींच्या दौऱ्याची कल्पना असताना आणि राज्य सरकारने मोदींच्या संरक्षणाची (Prime Minister Security) हमी दिली असतानाही, त्यात घोडचूक झाल्याने भाजपकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

त्‍या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील शिव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ आयुष्‍यासाठी महामृत्‍युंजय मंत्र पठण केले. यानंतर पंजाब सरकारच्या निषेधार्थ आशिष शेलार यांनी भाजप कार्यकर्त्यांसह कॅन्डल शांती मार्च काढला.

या प्रकारावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया समोर आलेली असून त्यांनी म्हंटलं आहे की, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो”, अशी प्रतिक्रिया मोदींनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिली.

दरम्‍यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षाविषयक (Prime Minister Security) हलगर्जीपणाविषयी त्यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या गंभीर घटनेविषयी चिंता व्यक्त केली.

त्यानंतर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीदेखील पंजाबमध्ये झालेल्या घटनेविषय़ी पंतप्रधानांसोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांनी सुरक्षा व्यवस्थे झालेल्या हलगर्जीपणाविषयी गंभीर चिंता व्यक्त केली.भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी सुरक्षा प्रोटोकॉलचे कठोरपणे पालन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात नेमकं काय झालं…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होता. त्यामुळे ते भटिंडा येथे पोहोचले आणि तेथून ते हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जाणार होते. परंतु, पाऊस आणि खराब वातावरण यामुळे पंतप्रधानांना हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहावी लागली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने रस्त्याने ते राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचा निर्यण घेतला.

आता हा प्रवास २ तासांचा होता. अशात गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली होती. या भरोशावर पंतप्रधान रस्त्याने प्रवासासाठी निघाले. मात्र, राष्ट्रीय स्मारकापासून केवळ ३० किलोमीटर पंतप्रधानांचा ताफा आला असताना त्या उड्डाणपुलावर काही आंदोलकांनी रस्ता अडविला. त्यामुळे पंतप्रधानांना पुन्हा २० मिनिटं थांबावे लागले.

Back to top button