

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा रोखल्यामुळे भाजप नेत्यांकडून काॅंग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. अशा पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दिर्घायुष्यासाठी मुंबईची ग्रामदैवत असणाऱ्या मुंबादेवीजवळ प्रार्थना केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Gandhi Vs Modi)
पंजाबमध्ये झालेल्या प्रकारावर काॅंग्रेस नेते नाना पटोले यांनी 'नौटंकी' असल्याचं म्हंटलं. त्याचबरोबर इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलनाच होऊ शकत नाही, यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, "तुलना कोणाचीच कोणाशी होत नाही. पण इंदिरा गांधींशी (Gandhi Vs Modi) तुलना करुन त्यांच्याप्रमाणेच मोदींचं व्हावं अशी अपेक्षा करत आहात का? आपण काय बोलतो, त्याचा काय अर्थ लागतो याचा आपल्याला तरी पत्ता असतो का? नौटंकी तर तुम्ही करत आहात. विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा देता, राज्याचे अध्यक्ष होता. मंत्रिमंडळाची इच्छा व्यक्त करता", असं मत पाटील यांनी मांडलं.
पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?
पंजाबमधील रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रूटी राहिल्याने रद्द करण्यात आली. कारण, आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना १५ ते २० मिनिटं उड्डाण पुलावर थांबावं लागलं. मोदींच्या दौऱ्याची कल्पना असताना आणि राज्य सरकारने मोदींच्या सरक्षणाची हमी दिली असतानाही, त्यात घोडचूक झाल्याने भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकारावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया समोर आलेली असून त्यांनी म्हंटलं आहे की, "तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो", अशी प्रतिक्रिया मोदींनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होता. त्यामुळे ते भटिंडा येथे पोहोचले आणि तेथून ते हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जाणार होते. परंतु, पाऊस आणि खराब वातावरण यामुळे पंतप्रधानांना हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहावी लागली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने रस्त्याने ते राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचा निर्यण घेतला.
आता हा प्रवास २ तासांचा होता. अशात गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली होती. या भरोशावर पंतप्रधान रस्त्याने प्रवासासाठी निघाले. मात्र, राष्ट्रीय स्मारकापासून केवळ ३० किलोमीटर पंतप्रधानांचा ताफा आला असताना त्या उड्डाणपुलावर काही आंदोलकांनी रस्ता अडविला. त्यामुळे पंतप्रधानांना पुन्हा २० मिनिटं थांबावे लागले.
यावर गृहमंत्रालयाने सांगितले की, "या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परत आणण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे मोदींची फिरोजपूर रॅली रद्द करण्यात आली आहे."
पहा व्हिडीओ : वेदनेशी आणि भुकेशी नातं सांगणाऱ्या सिंधुताईंचा संघर्षमय प्रवास