Manoj Jarange-Patil : अजित पवार अपघाताने उपमुख्यमंत्री झाले: जरांगे - पाटलांचा पलटवार
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काहीही झालं तरी येत्या २० जानेवारीरोजी आम्ही मुंबईत येणारच आहोत, असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर, कुणीही कायदा हातात घेतला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे -पाटील यांना इशारा दिला आहे. यावर जरांगे -पाटील यांनीही पवार यांच्यावर पलटवार करत जशास तसे उत्तर दिले आहे. Manoj Jarange-Patil
. गोदा पट्यातील १२३ गावांच्या दौऱ्यात ते अंबड तालुक्यातील दह्याळा गावात पत्रकारांशी बोलत होते. मराठ्यांना तुमच्या विरोधात बोलायला लावू नका, तुम्हाला हे शेवटचं सांगणे आहे. मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, अन्यथा तुमच्याकडे बघावं लागेल. तुम्ही अपघाताने झालेले उपमुख्यमंत्री आहात, तुम्हाला मराठा समाज उत्तर देईल, असेही जरांगे यावेळी म्हणाले. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. Manoj Jarange-Patil
जरांगे -पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्या पोटातले ओठांवर आले आहे. अजित पवार यांना नोंदी सापडलेल्या माहित नाहीत का? ते महाराष्ट्रातच राहतात का? राज्यभरात ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांसह अर्धे मंत्रिमंडळ सांगत आहे. तसेच कायदा पारित करण्यासाठी आम्हाला नोंदी आवश्यक आहेत, त्या नोंदी सापडल्या आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. संविधानाच्या चौकटीतच आरक्षण मिळेल, असे असताना ते विरोधात का बोलतात? असा सवाल जरांगे- पाटील यांनी केला आहे.
कायद्याची चौकट तुम्हाला कळते, ती वेगळी असते आणि करतात ते वेगळं असते. ही खरी चौकट आहे. यात मराठा आरक्षणात बसतोय, विनाकारण मराठ्यांच्या विरोधात काहीही भाष्य करून मराठा समाज आणि सरकारमध्ये गैरसमज निर्माण करू नका. तुम्हाला बोलायचे तर मराठ्यांच्या बाजूने बोला, अन्यथा आत्तापर्यंत तुम्ही जसे गप बसले, तसं गप्प बसा, याच्यासाठीच तुम्ही गप्प बसला होतात का ? असा सवालही जरांगे- पाटील यांनी उपस्थित केला.
हेही वाचा