Kadvi Dam: कडवी मध्यम प्रकल्पात ६३ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा जादा पाणीसाठा | पुढारी

Kadvi Dam: कडवी मध्यम प्रकल्पात ६३ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा जादा पाणीसाठा

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाई ते पाटणे दरम्यान असलेल्या बावीस गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी व पिण्यासाठी वरदान ठरलेल्या परळे निनाई येथील कडवी मध्यम प्रकल्पात आजमितीला ६३.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. योग्य पाणी व्यवस्थापनामुळे पाणीटंचाई भासणार नसल्याचे कडवी धरण शाखा अभियंता अजय पुनदीकर यांनी सांगितले. Kadvi Dam

कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता ७१.२४० दलघमी म्हणजे २.५१ टीएमसी आहे. दरवर्षी १०० टक्के धरण भरते. गतवर्षी धरण तीनदा ओव्हर फ्लो झाले होते. सध्या धरणात शनिवारी (दि ३०) रोजी सकाळी ७ वाजता धरणाची पाणीपातळी ५९५.१५ मीटर होती. उपयुक्त पाणीसाठा ४४.७७ दलघमी म्हणजे १.५८ टीएमसी असून धरण ६३.४५ टक्के भरले आहे. गतवर्षी मार्चअखेर १.४२ टीएमसी पाणीसाठा होता. योग्य नियोजनामुळे गतवर्षीपेक्षा पाणीसाठा अधिक शिल्लक आहे.  Kadvi Dam

कडवी धरणावर परळे निनाई, भेंडवडे, लोळाणे, पुसार्ळे, आळतूर, करूंगळे, वालूर, निळे, कडवे, येलूर, पेरीड, गाडेवाडी, मलकापूर, कोपार्डे, शिरगाव, सांबू, मोळवडे, सावर्डे, सवते, सावे, पाटणे व शिंपे ही बावीस गावे अवलंबून आहेत. शिवाय मलकापूर नगरपालिका व उदय साखर कारखान्यासही पाणीपुरवठा केला जातो. धरण २.५१ म्हणजे अडीच टीएमसीचे आहे. धरणात ७१.२४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असतो. पाण्याच्या योग्य नियोजनामुळे धरणातील पाणीसाठा कधीही शून्यावर आलेला नाही. पाणी साठवणुकीसाठी वालूर, सुतारवाडी, येलूर, भोसलेवाडी, शिरगाव, कोपार्डे, पाटणे व सवते-सावर्डे या आठ ठिकाणी बंधारे आहेत. परळे निनाई ते पाटणेदरम्यान असलेल्या बावीस गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी व पिण्यासाठी महिन्याकाठी दहा टक्के पाणी लागते. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाण्याची चणचण भासणार नाही.

योग्य नियोजनामुळे  कडवी धरणात गतवर्षीपेक्षा जादा साठा उपलब्ध आहे. लाभक्षेत्रातील गावांना पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाही. तरीही उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर जपून करावा.
– अजय पुनदीकर,  शाखा अभियंता, कडवी धरण

हेही वाचा 

Back to top button