कोल्हापूर : उन्हाच्या तडाख्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत | पुढारी

कोल्हापूर : उन्हाच्या तडाख्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत

शिरढोण; बिरु व्हसपटे : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. मागील काही दिवसात अंगाची लाही-लाही होतेय. यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरतोय. राज्यात अनेक ठिकाणी तर तापमान काही ठिकाणी ४४ अंशांपर्यंत पोहोचलं आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. याचा फटका सध्या पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पार गेलं आहे. त्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण तर वाढलं आहेच सोबत अंडी उत्पादनातही घट झाली आहे.

संबंधित बातम्या 

सध्या सूर्य आग ओकतो आहे. याचा फटका जसा माणसांना बसत आहे, तसाच तो पशु पक्षांनाही बसत आहे. जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायिकांच्या चिंता वाढल्यात. शिरोळ तालुक्यात पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच अंडी देणाऱ्या पक्षांचे व मांसल पक्षांचे पोल्ट्री फार्म ही असंख्य आहेत. जर तापमान ३० अंशाच्या पार गेल्यास पक्षांची मर सध्या वाढत आहे. सध्या येथील पारा वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

उन्हासोबत अनेक भागात विजेचे भारनियमन, कमी दाबाने वीज पुरवठा होणे यामुळेही व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. भारनियमनामुळे व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फॉगरसाठीही पाणी उपलब्ध होत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १२ टक्क्यांनी मर वाढली असल्याचे पोल्ट्री व्यावसायिक सांगतात. कंपनीकडून ५ टक्के मर ग्राह्य धरून व्यावसायिकांना मोबदला दिला जातो. मात्र, मर वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

उष्णतेपासून पक्षांची अशी काळजी घ्या

उष्णतेपासून पक्षांची काळजी घेण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी शेडमध्ये फॉगरची सुविधा करणे गरजेचं आहे. सोबत शेडवर चुन्याचा लेप लावणे, शेडवर नारळाच्या झावळ्या किंवा गवताचे आच्छादन टाकणे गरजेचे आहे. तसेच पोल्ट्री शेडमध्ये पंखा किंवा कुलर लावणे देखील गरजेचे आहे.

उन्हाळ्यात मांसल कोंबड्यांची मागणी घटते, त्यामुळे कंपनीकडून पक्षांची उचल वेळेत होत नाही. त्याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसतो आहे. त्यामुळे सध्या नैसर्गिक संकटासोबत कंपनीमुळेही पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

उन्हाची तीव्रता वाढल्याने पक्षी उष्माघाताने मरण्याचे प्रमाण वाढले आहे. पक्षांची वाढ होण्यास जास्त कालावधी लागत आहे. तसेच मोठ्या पक्षांची मर वाढल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. खर्च अधिक दर कमी मिळत असल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे.
दीपक काकडे, ( शिरढोण, पोल्ट्री व्यावसायिक )

Back to top button