दिव्यांगांच्या योजनांसाठी ‘एक खिडकी’
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे. यासाठी शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘शासन आपल्या दारी’साठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे समितीचे सदस्य सचिव असतील.
शासनाने दिव्यांग कल्याण विभाग स्वतंत्र केला असून, दिव्यांग विभागाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने शासनाने विधानसभा सदस्य ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता दिव्यांग विभाग ’अॅक्शन मोड’वर आला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात एकूण 29 लाख 63 हजार 392 इतकी दिव्यांगांची संख्या असून, त्यापैकी केवळ 9 लाख दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र प्राप्त झाले आहे. उर्वरित दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र नसल्याने अनेक योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या शिबिरात वैश्विक ओळखपत्र देण्याच्या कार्यक्रमाला गती मिळणार आहे.
हे ही वाचा :
Ashadhi Wari 2023 : दुपारच्या विसाव्यासाठी तुकाराम महाराज पालखीचे नागेश्वर मंदिरात आगमन