Nashik Lok Sabha | वाजेंना उमेदवारी दिल्याने करंजकर नाराज, म्हणाले यामागे कुणाचा हात ते लवकरच...
पुढारी ऑनलाइन डेस्क – शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभेसाठी विजय करंजकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. सुरुवातीपासूनच त्यांचे नाव चर्चेत होते मात्र, आज दि.27) नाशिक लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर झाल्याने विजय करंजकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
करंजकर म्हणाले, 2014 व 2019 ला मी इच्छुक होतो, दोन्ही वेळेला पक्षप्रमुखांनी थांबा म्हणून सांगितले, मी थांबलो. आता तिसऱ्यांदा पुन्हा तेच वाट्याला आले. आजवर 13 वर्षात प्रामाणिक राहुन पक्षाचे काम केले. उमेदवार कसेही असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरेंनी मला तयारी करण्यासाठी सांगितलं होतं. तेव्हापासून मी पायाला घुंगरं लावून मतदारसंघात फिरत होतो. दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या अधिवेशनावेळी देखील उद्धव साहेबांनी मला त्यासंदर्भात विचारुन तयारी कुठपर्यंतत सुरु आहे असे विचारले होते. संजय राऊतही होते. त्यावेळेलाही साहेबांनाही मी लढेल व जिंकेल असा शब्द दिला. असे असताना काल पर्यंत माझं नाव होतं. नाशिकमध्ये अनेक सर्वे झाले विजय करंजकर नावाला सगळ्यांची पसंती होती नावाची पसंती येत होती. असे असतानाही मी एकनिष्ठ होतो राहील पण, निष्ठा कुठपर्यंत ठेवावी? त्याचे फलित काय हाही विचार करावा लागेल असे करंजकर म्हणाले.
उद्धव साहेबांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार
उद्धव साहेबांची भेट घेऊन त्यांना याबाबत विचारेल असेही करंजकर म्हणाले. आपण आता पर्यंत निष्ठेने राहिलो, निष्ठू विकू दिली नाही. 13 वर्षाच्या काळात प्रामाणिकपणे काम करत राहिलो. मी खुद्दार आहे, गद्दार नाही. मी बघेल आजून खूप वेळ आहे. निर्णय उलटेपालटे होत असतात. काही वेळेला वाट पवाही लागते वाट बघू असे आवाहन कार्यकर्त्यांना करत मी लढणार आणि पाडणार व माझी ताकद दाखवून देणार असा निर्धार करंजकर यांनी व्यक्त केला.
कोणाचे हात व कुणाचे पाय कळेलच
एक दोन दिवसात झालेले हे बदल आहेत. पक्षप्रमुखांशी त्यावर मी बोलेल त्यांना काही गोष्टी पटवून देईल. असं दरवेळेला थांबणार नाही, साहेबांना भेट घेऊन अपेक्षा व्यक्त करेल. घाई करणे तत्वात नाही. निर्णय बदलला यात संजय राऊतांचा हात आहे का, की कुणाचा हात आहे असे वाटतो असे विचारले असता कोणाचे हात व कुणाचे पाय आहेत ते बघूच. काही काळ तपास केल्यानंतर ते समजेलच. पण मी लढणार म्हणजे लढणार आणि पाडणार असेही करंजकर म्हणाले.