‘मविआ’चा ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ : खा. डॉ. अमोल कोल्हे | पुढारी

'मविआ'चा 'शेतकरी आक्रोश मोर्चा' : खा. डॉ. अमोल कोल्हे

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत महाविकास आघाडीच्या वतीने ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांना दिली. कांद्यावरील निर्यातबंदी, दुधाचे पडलेले दर, यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे, खासदार कोल्हे यांनी संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी केली असता या दोघांनाही निलंबित करण्यात आले. आता ही लढाई रस्त्यावर लढण्याचा इशारा कोल्हे यांनी दिला आहे. त्यानुसार कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चे रणशिंग फुंकले.

या बैठकीत ठरल्यानुसार दि. २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चा प्रारंभ २७ तारखेला शिवनेरी (जुन्नर) येथे होणार असून ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर, चाकण (मशाल मोर्चा), केंदूर पहिला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी (दि. २८ ) केंदूर येथून शिक्रापूर, न्हावरा, मांडवगण, निर्वीमार्गे दौंड येथे मुक्कामी जाईल. दि. २९ डिसेंबरला दौंड येथून इंदापूरमार्गे बारामती येथे जाणार असून, बारामती शहरात मशाल मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला जाईल. अखेरच्या दिवशी (दि. ३०) बारामती येथून उरुळी कांचन, कुंजीरवाडी, हडपसरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी ३ वाजता सांगता सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button