PM Narendra Modi: ‘फोन बॅंकिंग घोटाळा’सर्वात मोठा घोटाळा; नाव न घेता पंतप्रधानांचा काँग्रेसवर निशाणा | पुढारी

PM Narendra Modi: 'फोन बॅंकिंग घोटाळा'सर्वात मोठा घोटाळा; नाव न घेता पंतप्रधानांचा काँग्रेसवर निशाणा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: बँकिंग क्षेत्र सर्वाधिक बळकट मानले जाते, पंरतु ९ वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. गत सरकारच्या काळात देशाच्या बँकिंग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात नास बघायला मिळाला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केला. पंतप्रधानांनी शनिवारी (दि.२२ जुलै) सातव्या रोजगार मेळाव्यातून ७० हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्र सुपूर्द केला. देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये ४४ ठिकाणी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधानांनी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नाव घेता त्यांच्या कार्यकाळात झालेल्या बॅंकिंग घोटाळ्याचा (PM Narendra Modi) उल्लेख केला.

आज आपण डिजिटल घेवाणदेवाण करण्यात सक्षम आहे. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात फोन बॅंकिंग १४० कोटी देशवासियांसाठी नव्हते. जे लोक एका खास कुटुंबियांचे जवळचे होते ते बँकांना फोन करीत होते आणि त्यांना एका फोन वर हजारो कोटी रुपयांचे कर्ज दिले जात होते. या कर्जाची कधी परतफेड केली जात नव्हती. या कर्जाच्या परतफेडीसाठी आणखी कर्ज दिले जात होते.फोन बँकिंग घोटाळा गत सरकारच्या दरम्यान झालेला सर्वात मोठा घोटाळ्यांपैकी एक होते,असे पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले.

या घोटाळ्यामुळे बँकिंग सेक्टरचे कंबरडे मोडले. २०१४ मध्ये आम्ही बँकिंग क्षेत्राला पुनर्जीवित करण्यास सुरूवात केली. देशातील सरकारी बँकांचे व्यवस्थापन मजबूत केले. अनेक छोट्या बँकांना एकत्रित करीत मोठे बँक बनवले आहेत. एखादी बँक बंद झाली तर कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठीच सरकारने दिवाळीखोरी कायदा यासाठीच बनवल्याचे मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

१९४७ मध्ये आजच्याच दिवशी २२ जुलै रोज संविधान सभेने तिरंग्याचे डिझाईन निश्चित केले होते.आजच्या दिवशी नोकरी मिळणे प्रेरणादायी बाब आहे.सरकारी नोकरीत असतांना तिरंग्याच्या सन्मानावर कुठलेही संकट येणार नाही याची काळजी घ्यावी,असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

२२ आक्टोबर २०२२ पासून पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याला सुरूवात केली आहे. गेल्या ८ महिन्यांमध्ये ६ रोजगार मेळाव्यातून ४ लाख ३३ हजारांहून अधिक युवकांना सरकारच्या विविध विभागात नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. सातव्या रोजगार मेळाव्यात वेगवेगळ्यात राज्यातून केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते. अहमदाबाद मधून मनसुख मांडविया, शिमला येथून अनुराग सिंह ठाकूर, मुंबईतून स्मृती इराणी तसेच पियूष गोयल, नागपूर मधून नितीन गडकरी, जयपूर मधून अश्विनी वैष्णव, पाटण्यातून पशुपतीनाथ पारस, वडोदरातून पुरषोत्तम रुपाला, फरीदाबाद मधून भूपेंद्र यादव, बंगळुरूतून प्रल्हाद जोशी, चंदीगड मधून हरदीप सिंह पुरी, सिंकदराबाद मधून जी.किशन रेड्डी,सागर येथून डॉ.विरेंद्र कुमार उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button