नाशिक : वीजतारांच्या घर्षणात लागलेल्या आगीमुळे आंबा बाग जळून खाक
नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
ञ्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली शिवारात फार्महाऊसच्या जागेतून गेलेल्या वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत 13 एकर क्षेत्रावरील शेकडो आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत. त्याचसोबत ठिबक सिंचन व 100 फिनोलेक्स पाईप जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
मंगळवार (दि.25) रोजी दुपारच्या वेळेस आंबोली शिवारात नाशिक येथील अतूल वडगावकर यांच्या फार्महाऊसमध्ये वीजवाहक तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने गवतावर ठिणग्या पडल्या. तोच शेतात असलेल्या सुकलेल्या गवताने पेट घेतला व आग पसरली. यामध्ये पेरूची 100 झाडे जळाली. उन्हाचा कहर असल्याने वाळलेले गवत पेटत गेले. तसेच शेजारी असलेल्या ञ्यंबकेश्वर येथील रंगनाथ आराधी व प्रभावती आराधी यांच्या शेतातील आंब्याच्या बागेत आग पसरली. दरम्यान परिसरातील शेतक-यांनी धूर दिसताच घटनास्थळी धाव घेतली. मात्र वडगावकर यांच्या शेतीला असलेले कुंपण व फाटकाला कुलुप असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी त्वरीत जाता आले नाही. दरम्यान ञ्यंबकेश्वर येथून नगरपालिकेचा अग्निशामक बंब बोलावण्यात आले. नगरपालिका कर्मचारी नितीन शिंदे, भाऊराव सोनवणे, शेतकरी अनिल बिरारी यासह उपस्थितांनी तातडीने प्रयत्नपूर्वक आग विझवली. मात्र तोपर्यंत आंब्याच्या बागेतील शेकडो वृक्ष जळून खाक झाले. तसेच झाडांसाठी करण्यात आलेले ठिबक सिंचन आणि पाणी पुरवठा करणारे फिनोलेक्सचे 100 पाईपही जळाले असल्याने मोठे नुकसान झाले आहे. गावचे पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी व कोतवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. महावितरण कंपनीचे अधिकारी यांनी भेट दिली तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांनी देखील घटनास्थळाची माहिती देतांना सांगितले की, ठिणग्या पडून आग लागली त्या ती जागा कुलूप बंद असल्याने तेथे पोहचता आले नाही व डोळ्यादेखत समक्ष पिकाचे नुकसान झाले याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. दरम्यान महावितरण अधिकारी, गावकामगार तलाठी, कृषी सहायक यांचा संयुक्त पंचनामा झाल्यानंतर नुकसानीचा स्पष्ट अंदाज येईल असे संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी सांगितले आहे.