किरीट सोमय्यांनी बिल्डरांकडून सुपारी घेतली आहे; त्यांनी इथे यावं, आम्ही स्वागताला तयार : अनिल परब | पुढारी

किरीट सोमय्यांनी बिल्डरांकडून सुपारी घेतली आहे; त्यांनी इथे यावं, आम्ही स्वागताला तयार : अनिल परब

पुढारी ऑनलाईन डेस्क : किरीट सोमय्या यांनी बिल्डर लोकांची सुपारी घेऊन माझ्यावर आरोप केला आहे. वांद्रेतील गरीबांच्या घरांवर वरंवटा फिरणार असेल तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. सोमय्या महापालिकेचा मुकादम आहे का? मंत्री असताना गप्प होतो, पण आता शिवसैनिक म्हणून उत्तर देणार. हिंमत असेल तर सोमय्यांनी इथे यावं, त्यांचं स्वागत करायला आम्ही तयार आहे, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी त्यांच्या वांद्रे येथील कार्यालयाचं पाडकाम पाहायला येणाऱ्या किरीट सोमय्या यांना दिले आहे. आम्ही पक्ष बदलावा यासाठी दबाव टाकला जात आहे. हा भाजपने सोमय्यांच्या माध्यमातून साधलेला डाव आहे, असा घणाघात परब यांनी केला आहे.

वांद्रे येथील इमारतीत अनिल परब यांचे कार्यालय होते. तेथील बांधकाम अनधिकृत आहे, अशी तक्रार किरीट सोमय्या यांनी म्हाडाकडे केली होती. त्यानंतर परिसरातील बांधकाम पाडण्यात आले. यानंतर रहिवासी आक्रमक झाले आहेत. यावर परब यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले की, “जन्मापासून मी या इमारतीचा रहिवासी आहे. या बिल्डींग म्हाडाच्या नाहीत तर स्वमालकीच्या झाल्या आहेत. येथील लोकांनी माझे जनसंपर्क कार्यालय या इमारतीतच असावे, असे सांगितले. म्हणून गेले कित्येक वर्षे ही जागा वापरत होता. जेव्हा मंत्री झालो तेव्हा सोमय्या यांनी हे अनधिकृत कार्यालय आहे, असं भासवून ते तोडण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने म्हाडाने मला नोटीस दिली. त्याला उत्तर देताना मी या जागेचा मालक नाही. या जागेशी माझा काही संबंध नाही, असं सांगितलं. यानंतर म्हाडाने नोटीस मागे घेतली होती.”

हायकोर्टाच्या सूचनेनुसार जागा नियमित करण्यासाठी रहिवाशांनी अर्ज केला होता. पण काही दिवसांपूर्वी म्हाडाने सांगितलं की जागा कायम करता येणार नाही. सोमय्या यांनी म्हाडावर वारंवार दबाव टाकला आणि म्हाडाला जागा नियमित करू नये, असे सांगितले, असा आरोप परब यांनी केला.

म्हडाच्या ५६ वसाहती आहेत सर्व वसाहती पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. वसाहतींमध्ये मराठी गरीब माणसांनी थोडी जागा वाढवली आहे. जेव्हा घरे वाढवली होती तेव्हा या जागा नियमित करण्यासाठी रहिवाशांनी अर्ज केला होता. ही जागा नियमित करता येणार नसल्याचं कळल्यानंतर ती मोकळी केली होती. भाजपने सोमय्यांच्या माध्यमातून साधलेला हा डाव आहे. जागेची पाहणी करायला किरीट सोमय्या कोण आहे? म्हाडाचा आधिकारी आहे का? सोमय्यांनी यावं त्यांचं स्वागत करायला आम्ही तयार आहे, असे आव्हान परब यांनी दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button