संरक्षण : धोका चिनी ‘सुपर सोल्जर्स’चा | पुढारी

संरक्षण : धोका चिनी ‘सुपर सोल्जर्स’चा

  • ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) 

जगाची महासत्ता बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेला चीन आता ‘सुपर सोल्जर्स’ बनवण्यासाठी वेगाने प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. मानवी गुणसूत्रांमध्ये बदल करून अवतरणारे हे ‘सुपर सोल्जर्स’ अन्नपाण्याशिवाय प्रदीर्घ काळ रणांगणावर लढण्यास सक्षम असणार आहेत. तसेच त्यांच्यावर रासायनिक अस्रांचाही प्रभाव होणार नाही.

अलीकडेच समोर आलेल्या वृत्तानुसार, चीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांच्या सैनिकांच्या ‘डीएनए’मध्ये फेरफार करून ‘सुपर सोल्जर्स’ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अशाप्रकारचे सोल्जर्स विकसित करण्याचा चीनचा प्रकल्प यशस्वी झाल्यास चिनी सैनिकांना अनेक दिवस न झोपता, न खाता-पिता लढता येण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. थोडक्यात, चीन त्यांच्या लष्करी जवानांची जैविक क्षमता वाढवणार आहे. यासाठी अनेक जैविक चाचण्या चीनने केल्या आहेत. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी दोन वर्षांपूर्वीच ही माहिती दिली होती. ती अमेरिकेच्या ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ या प्रख्यात पत्रिकेत प्रकाशित झाली होती. इंग्लंडनेही अशाप्रकारचा दावा केला आहे. अनेक शास्त्रज्ञांकडूनही याला पुष्टी मिळत आहे. साहजिकच, ही जगासाठी आणि खासकरून भारतासाठी अत्यंत धोक्याची आणि चिंतेची बाब आहे. परंतु, चीनकडून सध्या सुरू असलेला कथित प्रयोग हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून, तो थेट निसर्गाच्या रचनेतच हस्तक्षेप करणारा आहे. मानवी जनुकांचा समूह असणार्‍या गुणसूत्रांमध्ये बदल करणार्‍या तंत्रज्ञानाला जीन एडिटिंग किंवा जिनोम एडिटिंग, असे म्हटले जाते. या तंत्रज्ञानामुळे ‘डीएनए’मध्ये बदल केला जाऊ शकतो. तो करताना ‘डीएनए’मधील काही गोष्टी काढून टाकल्या जाऊ शकतात किंवा आवश्यक गोष्टी त्यामध्ये वाढवल्या जाऊ शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून चीन युद्धामध्ये इतर देशांवर वरचढ ठरू शकतो. ‘क्रिश-3’ या चित्रपटामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, याचे चित्रण दाखवण्यात आले होते. त्यानुसार मानवाचे आणि प्राण्याचे ‘डीएनए’ एकत्र करून एक संकरित प्रजाती तयार केलेली दाखवण्यात आली होती. आता चीन या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली युद्धक्षमता अमर्याद करण्याच्या प्रयत्नात आहे.

चीन हे का करतो आहे? याचे मुख्य कारण म्हणजे, अत्यंत उंच जागांवर चिनी सैनिकांची लढण्याची ताकद किंवा क्षमता कमी पडू शकते. कारण, या भागात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. तसेच तापमानाचा पारा शून्याहून किती तरी खाली गेलेला असतो. सामान्यतः, असे मानले जाते की, कोणत्याही सैनिकाचे जितके वजन असते त्याच्या निम्म्या वजनापेक्षा अधिक सामान त्याच्या पाठीवर नसावे. एका सैनिकाचे वजन 60 ते 65 किलो असल्यास त्याला त्याच्या पाठीवर 30 ते 35 किलो इतक्या वजनाचे सामान दिले जाते. यामध्ये त्याची रायफल, अ‍ॅम्ब्युशन, जेवण आणि हँडग्रेनेडस्सारखा दारूगोळा यांचा समावेश असतो. तथापि, अतिउंच भागात सैनिकांची क्षमता कमी झालेली असते. म्हणजेच समुद्रसपाटीवर एखादा सैनिक 35 किलो वजनाचे साहित्य वाहून नेत असेल; तर सुपर हाय अल्टिट्युडमध्ये तो 10 ते 15 किलोपेक्षा कमी वजनाचा भाग पेलू शकतो किंवा वाहून नेऊ शकतो. याखेरीज अतिशीत हवामानामुळे या भागात सतत वास्तव्यास असणार्‍या सैनिकांना उच्च रक्तदाब, हृदयविकारासारखे आजार जडण्याची तसेच लवकर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. तसेच या वातावरणामुळे सैनिकांचे आयुष्यमानही कमी होते, असे मानले जाते. या सार्‍या मर्यादा, उणिवा लक्षात घेऊन चीनने ‘सुपर सोल्जर्स’ बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. असे ‘सुपर सोल्जर्स’ रात्रीच्या वेळी जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतील, त्यांची ताकद, दमसास खूप वाढलेला असेल आणि सर्वसाधारण सैनिकांच्या तुलनेत पुष्कळ अधिक वेळ या कठीण सीमेवर ते चांगल्या पद्धतीने काम करून शत्रूचा पराभव करू शकतील, असे चीनला वाटते. यासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून चीनने त्यांच्या लष्करामध्ये चाचण्या सुरू केल्या आहेत. यामागचे आणखी एक कारण म्हणजे, चीनच्या ‘पीएलए’मधील सैनिकांमध्ये बहुतांश जवान हे शहरी भागातले आहेत. त्यामुळे ते उंच हिमशिखरांवर प्रतिकूल वातावरणात राहण्यास तयार नाहीत. त्यामुळेही चीनने ‘सुपर सोल्जर्स’ बनवण्याचा घाट घातला आहे.

चीनकडून केला जाणारा हा प्रकार अर्थातच नीतीशास्त्राला धरून नाही; पण जागतिक महासत्ता बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या चीनने कधीच नैतिकेचे पालन केलेले नाही. ज्याप्रकारे त्यांनी वुहानच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना विषाणूची निर्मिती करून जगाचे कंबरडे मोडले आहे, तशाच प्रकारे जैविक संशोधन करून जगावर राज्य करण्याची त्यांची लालसा आहे. याचा जगाने फारच गांभीर्याने विचार केला पाहिजे.

आता प्रश्न उरतो तो ‘सुपर सोल्जर्स’ बनवणे खरोखरीच शक्य आहे का? इतिहासात डोकावल्यास जगामध्ये अशाप्रकारचे प्रयोग नेहमीच सुरू असतात. विशेषतः, क्रीडा क्षेत्रात अशाप्रकारचे सुपर अ‍ॅथलिट जगाने पाहिले आहेत. ते क्षमता वाढवण्यासाठी अनेकदा हार्मोन्सची इंजेक्शने घेतात, स्टेरॉईडचे सेवन करतात; जेणेकरून ठराविक काळापुरती त्यांची क्षमता वाढते. जागितक विक्रम करण्यात त्यांना मदत होते; पण यामुळे अगदी जागतिक दर्जाचे खेळाडूही अडचणीत आलेले आपण पाहिले आहे. याबाबतचे उदाहरण पाहूया. काही वर्षांपूर्वी ज्यो ग्रिफिक जॉयनर नावाच्या अमेरिकन महिला खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेत दोनवेळा जागतिक स्तरावर सुवर्णपदक जिंकले होते. 10 सेकंदांहून कमी काळात 100 मीटर पार करणारी ती इतिहासातील पहिली महिला खेळाडू ठरली होती. तिच्या या जागतिक विक्रमामुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. आजवर एकाही महिलेला जे जमले नाही ते जॉयनरने करून दाखवल्यामुळे अनेकांनी संशयही व्यक्त केला होता. ती कोणत्या तरी अमली पदार्थाचा वापर करत असावी, अशी चर्चाही सुरू झाली. हा संशय खरा ठरला आणि जागतिक विक्रम मोडीत काढल्यानंतर 4 वर्षांतच तिचा मृत्यूही झाला. तिच्या शरीरामध्ये वेगवेगळी उत्तेजक औषधे गेल्यामुळे मैदानावर तिला सुपर परफॉर्मन्स देता आला; परंतु अल्पावधीतच तिचा मृत्यू झाला. आपल्यापैकी अनेक जण ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’सारख्या कुस्ती स्पर्धा पाहत असतील. त्यामध्ये सहभागी असणारे मल्ल एकमेकांना खुर्चीने मारतात, दंडुक्याने मारतात, लोखंडी रॉडने मारतात; पण तरीही त्यांना  काहीही होत नाही असे दाखवले जाते; परंतु त्यांनाही स्टेरॉईडस् दिले जातात. त्यामुळे त्यांचाही मृत्यू लवकर होतो. याचाच अर्थ जैविक संशोधनाचा वापर करून आपली शारिरीक क्षमता प्रचंड प्रमाणात वाढवता येत असली तरी त्याचा मानवी शरीरावर होणारा दुष्परिणाम प्राणघातक ठरू शकतो.

खरे म्हणजे, जगामध्ये चालणार्‍या शास्रज्ञांच्या संशोधनाबाबत एक नियम बनवण्यात आलेला असून त्यानुसार अनैतिक किंवा निसर्गाच्या रचनेला बाधा आणणारे तंत्रज्ञान शोधण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. विविध दुर्धर आजारांवरील औषधांच्या शोधासाठी संशोधने करता येऊ शकतात. परंतु मानवाच्या गुणसूत्रांमध्ये बदल करण्यासारख्या संशोधनांवर बंदी घालण्यात आलेली आहे. परंतु चीनला महाशक्ती बनण्याची इतकी घाई झालेली आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय कायदे-नियम पायदळी तुडवून चीन अनेक विघातक गोष्टी करत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोविड महामारी. वुहानमधील प्रयोगशाळेमधून ते बाहेर पडले आणि संपूर्ण जगामध्ये हाहाःकार माजला. दोन-अडीच वर्षे चीनच्या या जैविक अस्राशी लढता लढता जागतिक अर्थकारण, अर्थव्यवस्था, आरोग्यव्यवस्था कोलमडून पडल्या. आता तर खुद्द चीनवरच हा भस्मासूर उलटलेला दिसत आहे. संपूर्ण जग या महामारीतून बाहेर पडून मोकळा श्वास घेत असताना चीनमध्ये कोविडचा उद्रेक झालेला आहे. निसर्गाच्या विरोधात केले जाणारे प्रयोग हे मानवजातीसाठी धोकायक असतात आणि त्यातून मानवी समूहांची अपरिमित हानी होते.

या पार्श्वभूमीवर चीनी शासनाच्या या घातक प्रयोगाविषयी, संशोधनाविषयी तेथील सैनिकांनीच आवाज उठवण्याची गरज आहे. चीनमध्ये निवृत्त सैनिकांची संख्या 80 ते 90 लाख इतकी आहे. त्यांनी याविरोधात पुढे आले पाहिजे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीने याबाबत चीनवर दबाव आणला आहे. पण चीन या दबावाला भीक घालणार का हा प्रश्न उरतोच.

मग पर्याय काय? यासाठी आपल्याला एक मानसिक युद्ध करावे लागेल. त्यानुसार चीनी नागरिकांना हे सांगावे लागेल की चिनी सरकार विघातक प्रयोग करुन त्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. तसेच चीनवर बारीक लक्ष ठेवून गरज भासली तर जगाची मदत घेऊन चीनचे घातकी संशोधन थांबवण्याची गरज आहे. इस्त्राईलने अनेक वेळा अशा प्रकारचे संशोधन – जे जगाच्या विरोधात जात होते- त्याबाबत कठोर भूमिका घेतलेली आहे. अशा संशोधन प्रकल्पांवर संशोधन करणार्‍या संशोधकांवर हल्लेही केले आहेत. मध्यंतरी इराणचे अणुशास्त्रज्ञ जे इराणसाठी अणुबॉम्ब तयार करत होते त्यांना ठार मारण्यात आले होते. त्यामुळे इराणचा आण्विक कार्यक्रम 10 वर्ष मागे पडला आहे. अशा प्रकारच्या कारवाया इतर युरोपियन राष्ट्रे चीनविरूद्ध करू शकतील का यावर सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. कारण चीनच्या या सुपर सोल्जर्सचा धोका केवळ भारताला नसून तो जगालाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने आहेच, हे नाकारता येणार नाही.

Back to top button