Sourav Ganguly : कोहलीच्या उचलबांगडीनंतर BCCI अध्यक्ष गांगुलींचा मोठा खुलासा, म्हणाले… | पुढारी

Sourav Ganguly : कोहलीच्या उचलबांगडीनंतर BCCI अध्यक्ष गांगुलींचा मोठा खुलासा, म्हणाले...

मुंबई; पुढारी ऑनलाईन : रोहित शर्माला (rohit sharma) वनडे संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. बीसीसीआयने विराट कोहलीला (virat kohali) वनडेच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कोहलीला पदावरून हटवण्यात आले. आता या निर्णयावर बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) यांनी मोठा खुलासा करत महत्त्वाचे विधान केले आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एएनआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने एकत्रितपणे घेतला आहे. बीसीसीआयने कोहलीला टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नये, असे सांगितले होते, पण त्याने ते मान्य केले नाही.’

विराटने टी २० चे कर्णधार पद सोडल्यानंतर रोहित शर्माला कर्णधार करण्यात आले. मर्यादित षटकांमध्ये दोन वेगळे कर्णधार नसावेत, असे निवडकर्त्यांना वाटत होते. त्यामुळे वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहितकडे सोपविण्यात आली. आता विराट कसोटी संघाचा कर्णधार राहणार असून रोहित वनडे आणि टी २० ची कमान सांभाळणार आहे.

कोहलीने टी २० कर्णधारपद सोडल्यावर गांगुली काय म्हणाले होते?

कोहलीने टी-२० सघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुलीने (sourav ganguly) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, विराट कोहलीने टी-२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने मला आश्चर्य वाटले. विराटने घेतलेला हा निर्णय इंग्लंड दौऱ्यानंतर घेतला गेला असावा. तो त्याचा स्वतःचा निर्णय आहे. बीसीसीआयकडून कोहलीवर कोणताही दबाव नव्हता. आम्ही त्याला कर्णधारपद सोडण्याबाबत काहीही सांगितले नाही. माझ्या मते क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एवढा काळ कर्णधार राहणे कठीण आहे. मी स्वतः सहा वर्षे टीम इंडियाचा कर्णधार होतो. बाहेरून सगळं छान दिसतं, पण आत काय चांलले आहे, कॅप्टनलाच महिती असतं.’

गांगुली आणि जय शाह ट्रोल…

रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार बनवल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले. कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर त्याचे चाहते चांगलेच संतापले होते.

Back to top button