कोहलीचा ४८ तासात दादाकडून ‘करेक्ट कार्यक्रम’ अन् ४२ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती! | पुढारी

कोहलीचा ४८ तासात दादाकडून 'करेक्ट कार्यक्रम' अन् ४२ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती!

मुंबई; पुढारी ऑनलाईन

टीम इंडियाच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीला ज्या प्रकारे हटवण्यात आले, त्यामुळे त्याचे चाहते खूप दुखावले गेले आणि निराशही झाले. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहली कर्णधारपद सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला २०२३ च्या विश्वचषक टीमचा कर्णधार व्हायचे होते, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला ही संधी दिली नाही. भारतीय क्रिकेटमध्ये अशी काही पहिलीच वेळ नाही, जेव्हा एखाद्या कर्णधाराला एवढ्या झटक्यात काढून टाकले गेले.

तथापि, ४२ वर्षांपूर्वी भारतीय संघाचे कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन यांनाही तडकाफडकी हटवण्यात आले होते. यापूर्वी वेंकटराघवन यांनी दोन विश्वचषकांमध्ये (1975 आणि 1979) भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वेंकटराघवन आणि संपूर्ण टीमला फ्लाइटमध्ये या फेरबदलाची माहिती मिळाली.

वेंकटराघवन यांना ४२ वर्षांपूर्वी हटवण्यात आले होते

वेंकटराघवन यांना1974 मध्ये दोन कसोटी सामन्यांचे कर्णधारपद मिळाले होते, ज्यात संघाचा पराभव झाला होता. त्यानंतर जून १९७९ पर्यंत वेंकटराघवन यांनी केवळ एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सांभाळले. कसोटीचे कर्णधारपद सुनील गावस्कर यांच्याकडे होते. त्यानंतर जुलै-ऑगस्ट १९७९ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या कसोटी मालिकेसाठी गावस्करांच्या जागी वेंकटराघवनला कर्णधार बनवण्यात आले. हा एक धक्कादायक निर्णय होता.

या इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाने 7 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 2 हरले आणि 5 अनिर्णित राहिले. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर टीम इंडिया मायदेशी परतत असताना अचानक फ्लाइटमधील पायलटजवळ चालू असलेल्या रेडिओवरून कळले की कॅप्टन वेंकटराघवन यांना संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. तेव्हा मोबाईल फोन किंवा इंटरनेट सारखे कोणतेही साधन नव्हते त्यामुळे टीमला अशी माहिती मिळाली. भारतीय बोर्डाने वेंकटराघवन यांना सर्व फॉरमॅटच्या (ODI, टेस्ट) कर्णधारपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी सुनील गावस्कर यांच्याकडे कमान सोपवण्यात आली.

कोहलीला ४८ तास मिळाले

आता ४२ वर्षांनंतरही जवळपास त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. जवळपास ५ वर्षांपासून संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या विराट कोहलीला घाईघाईने हटवण्यात आले. त्याच्या जागी रोहित शर्माला वनडे आणि टी-२० चे कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र, कसोटी फॉरमॅटमध्ये कोहलीच कर्णधार असेल.

पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आदरपूर्वक कोहलीला कर्णधारपद सोडण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला होता, परंतु कोहलीने प्रतिसाद न मिळाल्याने, बोर्डाने घेतली आणि त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले.

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांची आक्रमक शैली भारतीय क्रिकेट आणि चाहत्यांनी चांगलीच अनुभवली आहे. भारतीय संघाला सलग लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रवी शास्त्री आणि विराट कोहलीचा करेक्ट कार्यक्रम करत चांगलाच दणका दिला.  भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा राहुल द्रविड, एनसीए प्रमुखपदी व्ही.व्ही.लक्ष्मण यांच्याकडे देत गांगुली यांनी आपली चुणूक दाखवून दिली, तर रोहितला कॅप्टन करून कोहलीचा पत्ता कट करून टाकला. त्यामुळे गांगुली यांच्या कडक शिस्तीचा दणका चांगलाच विराट कोहलीच्या मनमानी प्रवृत्तीला बसला आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button