Katchatheevu Island row | श्रीलंकेला बेट देण्यावरून पीएम मोदींचा काँग्रेसनंतर DMKवर निशाणा | पुढारी

Katchatheevu Island row | श्रीलंकेला बेट देण्यावरून पीएम मोदींचा काँग्रेसनंतर DMKवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील कचाथीवू बेट श्रीलंकेला देण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी श्रीलंकेला कचाथीवू बेट देण्याच्या काँग्रेसच्या धोरणात्मक निर्णयावरून हल्लाबोल केला. त्यांनी तत्कालिन इंदिरा सरकारने कठोरपणे आणि असंवेदनशीलपणे ‘कचाथीवू’ बेट श्रीलंकेला दिल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पीएम मोदींनी आता तमिळनाडूतील डीएमके पक्षावरदेखील याच कचाथीवू बेटावरून निशाणा साधला. (Katchatheevu Island row)

पीएम मोदी यांनी ‘डीएमके’वर टीका करताना म्हटले आहे, कचाथीवू बेटासंदर्भातील माहिती अधिकारातून समोर आलेल्या तपशीलावरून द्रमुक पक्षाचा दुटप्पीपणाचा पर्दाफाश झाला आहे. केवळ बोलण्याशिवाय तामिळनाडूच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी द्रमुकने काहीही केले नाही. काँग्रेस आणि द्रमुक हे कौटुंबिक घटक आहेत. त्यांना फक्त त्यांची स्वतःची मुले-मुली वाढण्याची काळजी आहे. त्यांना इतर कोणाचीही कोणाचीही पर्वा नाही. तमिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या उदासीनतेमुळे येथील गरीब मच्छीमार आणि महिलांच्या हिताचे नुकसान झाल्याचा आरोपदेखील पीएम नरेंद्र मोदी यांनी केला आहे. (Katchatheevu Island row)

काँग्रेसवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही; पीएम मोदी

भारताची एकता, अखंडता आणि हित कमकुवत करणारी काँग्रेस आहे. गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने हीच पद्धत वापरत काम केल्याची टीकादेखील पीएम मोदींनी केली आहे. यावरून प्रत्येक भारतीयाला राग आला असून त्यांच्या मनात याविरोधात पुन्हा एकदा चीड निर्माण झाली आहे. यामुळे आम्ही काँग्रेसवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही, असे पीएम मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या श्रीलंकेच्या ताब्यात असलेले ‘कचाथीवू बेट’ प्रकरण नेमके काय?

तमिळनाडू हद्दीतील आणि सध्या श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या ‘कचाथीवू बेट’ प्रकरणात आरटीआयमधून मिळालेल्या उत्तरावरून असे दिसून आले आहे की, 1974 मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने एका करारानुसार कचाथीवू बेट श्रीलंकेला दिले होते. अधिकृत दस्तऐवज आणि संसदीय नोंदी हे उघड करतात की, तत्कालीन भारत सरकारने पाल्क सामुद्रधुनीतील एका बेटावर एका लहान देशाच्या नियंत्रणासाठी लढाई हरली होती. तर दुसरीकडे, श्रीलंका (तेव्हाचे सिलोन) सरकारने हे बेट हिसकावण्याचे सर्व प्रयत्न केले होते. आरटीआयच्या माध्यमातून कचठेवू बेटाबाबतचा हा खुलासा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:

Back to top button