Lok Sabha election: पक्षाचे प्राबल्य राहावे म्हणूनच उमेदवार पळवणे, पक्ष फोडणे असे प्रकार सुरू-अ‍ॅड. आंबेडकर | पुढारी

Lok Sabha election: पक्षाचे प्राबल्य राहावे म्हणूनच उमेदवार पळवणे, पक्ष फोडणे असे प्रकार सुरू-अ‍ॅड. आंबेडकर

नागपूर,पुढारी वृत्तसेवा: प्रस्थापित आणि विस्थापित या दोघांच्या समन्वयातून पुढे जावे असा माझा प्रयत्न होता. परंतु प्रस्थापित नेत्यांकडून विरोध झाला. प्रस्थापितांनी काँग्रेस, भाजप,राष्ट्रवादी आणि शिवसेनाही ताब्यात घेतला. खासदार, आमदार असलेले परस्परांशी निगडित लोक आहेत. आमचे उमेदवार विस्थापित वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. आमची कन्सेप्ट मान्य झाली नाही, त्यांची आपसातली भांडणे मिटली नाहीत. यामुळे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होऊ शकला नाही असे रोखठोक प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले. (Lok Sabha election)

निवडणूक रोखे जगातील सर्वात मोठा घोटाळा- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

वर्षानुवर्षे आपल्या मतदारसंघात दावा केला जातो, आपलेच प्राबल्य रहावे म्हणून उमेदवार पळविणे, पक्ष फोडणे हे प्रकार सुरू आहेत. यातूनच मनसेसारख्या पक्षाला भाजप सोबत घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप देखील आंबेडकर यांनी यावेळी केला. निवडणूक रोखे हा जगातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचे त्यांच्याच माणसांनी पुढे आणले. ज्या मेडिकल कंपन्यांची औषधे बॅन केली होती. त्या कंपन्यांनी डोनेशन दिल्यानंतर ती औषधी पुन्हा बाजारात आली. (Lok Sabha election)

फुले, शाहू ,आंबेडकरी चळवळ मुख्य शक्ती पहिल्यांदा पुढे येणार

देशात आज हुकमशाहीला जन्म दिला जात आहे. वारंवार सुप्रिम कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हे सर्व राष्ट्रीय मुद्दे तसेच महागाई, शेतकरी प्रश्न, रोजगार आणि स्थानिक प्रश्न घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहोत. अकोल्यात गेल्यावेळी माझ्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी अशी मत विभागणी झाली, पण यावेळेस तसे होणार नाही. पूर्व विदर्भात भाजप- वंचित अशी लढत होईल. फुले, शाहू ,आंबेडकरी चळवळ मुख्य शक्ती म्हणून पहिल्यांदा पुढे येईल. मुंबईच्या राहुल गांधींच्या सभेत आपण याबाबतीत भूमिका मांडली आहे. शेवटी स्पष्टपणे निवडणुकीत जो समोर असतो त्याला अंगावर घ्यावे लागते, लोकांचे हित यात महत्त्वाचे असते असे त्यांनी सांगितले. (Lok Sabha election)

लवकरच वंचित बहुजणच्या इतर उमेदवारांची देखील घोषणा

महाविकास आघाडीत आपआपसात ताळमेळ नाही. तीनही पक्ष वेगवेगळी उमेदवारी यादी देत आहेत. त्यांचे मतभेद न मिटल्याने वंचितचा आघाडीत समावेशाचा प्रश्न मागे पडला. मैत्रीपूर्ण लढती होणार हे आम्हाला दिसत होते. ही निवडणूक महत्त्वाची असल्याने आम्ही स्वतंत्र भूमिका घेत काही उमेदवार जाहीर केले. लवकरच इतर उमेदवारांची देखील घोषणा केली जाईल असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी डॉ रमेश गजबे, संजय केवट, राजेश बेले, दिनेश मडावी,शंकर चहांदे आदी उपस्थित होते. (Lok Sabha election)

हे ही  वाचा:

Back to top button