Sanjay Raut : संविधान रक्षणासाठी 'मविआ'सोबत यावे : संजय राउत यांचे आंबेडकरांना आवाहन
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०२४ ला परिवर्तन झाले नाही तर ही शेवटची निवडणूक असेल, असे भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. ३) केले. प्रकाश आंबेडकर यांनी हुकूमशाहीच्या पराभवासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आवाहन राऊत यांनी केले. राज्यातील गावागावांत असलेल्या आंबेडकर विचारसरणीच्या जनतेची हीच मानसिकता असल्याचे ते म्हणाले.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या खा. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वंचित व मविआची युती नसल्याच्या आंबेडकर यांच्या वक्तव्याकडे राऊत यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर बोलताना आंबेडकर विचारसरणी बघता हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी मविआत आंबेडकर यांनी सामील व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी मविआमध्ये सामील व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच बाळासाहेब आंबेडकर जिथे जातील तिथे संविधानाची भूमिका मांडत असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. 2024 ला परिवर्तन झाले नाही तर, शेवटची निवडणूक असेल आणि हुकुमशाही सुरू होईल. तीच भूमिका प्रकाश आंबेडकर मांडत असल्याचे राऊत म्हणाले.
राऊत यांनी भाजपच्या १९५ उमेदवारांच्या पहिल्या यादीवर टीकास्त्र सोडताना यातील सूत्र समजून घेतले पाहिजे. अजित पवार, अशोक चव्हाण, कृपाशंकर यांना तुरुंगात टाकण्याची भाषा फडणवीस यांनी केली होती. कृपाशंकर सिंह यांच्यावर गैरमार्गाने संपत्ती मिळवली असा आरोप होता. नंतर गृहमंत्री असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सिंह यांना क्लीन चिट दिली. तुरुंगात न पाठवता तिकीट दिले, ही मोदी गॅरंटी आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट व अशोक चव्हाण यांना तुरुंगात न टाकता राज्यसभा दिली ही मोदी गॅरंटी आहे. ज्यांना तुरुंगात टाकायचे त्यांना उमेदवारी दिली ही मोदी गॅरंटी, असल्याची टीका राऊत यांनी केली.
सुनेत्रा पवारांनी दावा दाखल करावा
उपमुख्यमंत्री पवार यांची बदनामी केली म्हणून सुनेत्रा पवार यांनी फडणवीस यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे, असे राऊत म्हणाले. भाजपच्या यादीवर भाष्य करताना भविष्यात 195 पैकी 70 लोक हे कृपाशंकर सिंह यांच्यासारखे असतील, असा दावा त्यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदी यांचा नामोल्लेख टाळताना इतके माेठे नेते असतानाही भाजपकडे स्वत:चे काही नसल्याची टीका राऊत यांनी केली.
हेही वाचा :