आंबेगाव, शिरूरच्या 45 गावांतील पिके धोक्यात ! | पुढारी

आंबेगाव, शिरूरच्या 45 गावांतील पिके धोक्यात !

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव व शिरूर तालुक्यांतील 45 गावांतील पिके उजवा कालव्याला पाणी नसल्याने धोक्यात आली आहेत. उजवा कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्यातील 45 गावांतील ऊस, कांदा, चारा-तरकारी पिके, पालेभाज्या सध्या सुकू लागली आहेत. शेततळी, पाझर तलाव, तळी, ओढे, नाले कोरडे पडले आहेत. विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. पिके जगवायला डिंभे उजवा कालव्याला पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्याने सहा ते सात दिवसांत पिकांना पाणी द्यावे लागते; अन्यथा पिके सुकून जातात. सध्या शेतात उभी असणारी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. डिंभे उजवा कालव्याला पाणी सोडण्यासह शेतकर्‍यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. या वर्षी धरणात असणारा पाणीसाठा व उन्हाची वाढणारी तीव्रता, यामुळे पाण्याची गरज निर्माण होणार आहे. पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केला नाही, तर मात्र एप्रिल-मे महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या संकटाला सामोरे जाऊ लागू शकते.

हेही वाचा

Back to top button