नागपूर : वीज केंद्रातील राखेचा बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान | पुढारी

नागपूर : वीज केंद्रातील राखेचा बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा फुटून त्यातील राख आणि चिखल अनेकांच्या शेतात पसरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खापरखेडा वीज केंद्रामधून निघणारी राख जवळच्या वारेगाव येथील राखेच्या बंधाऱ्यात साठवली जाते. मात्र, हा राखेचा अवाढव्य बंधारा राखेने भरल्याने त्यातून आता राखमिश्रित चिखल बाहेर वहायला लागला आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी बंधार्‍याला गळती लागल्याची माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिली.

मात्र, महानिर्मितीकडून दुरुस्तीचे काम वेळेत सुरु न झाल्याने हा बंधारा फुटून मोठ्या प्रमाणावर चिखलयुक्त राख बंधाऱ्याला लागूनच असलेल्या शेतांमध्ये पसरली. विशेष म्हणजे राज्यभरात, पूर्व विदर्भात पावसाचा जोर असला तरी नागपुरात पावसाचे प्रमाण कमी असूनही ही परिस्थिती उद्भवली आहे. काल व आजही नागपुरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. अशावेळी भरलेला राखेचा बंधारा उन्हाळ्याच्या काळात का रिकामा करण्यात आला नाही, असा सवाल आता गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, महानिर्मितीने बंधारा फुटलेल्या भागात दुरुस्तीचे काम सुरु केले असून लवकरच ही गळती थांबवली जाईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणाव राख बाहेर निघते. ही राख खसाळा-म्हसाळा परिसरातील तलावात साठवून ठेवली जाते. हाच बंधारा काल फुटला आणि त्यातून राखमिश्रीत पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. राखेचा थर साचल्याने अनेक वर्ष जमीन नापिक होते, त्यावर पिक घेता येत नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. दुसरीकडे या राखेमुळे पिण्याच्या पाण्याची तसेच आरोग्याची समस्या देखील वारंवार निर्माण होत आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button