कोल्हापूर : धरणात केवळ 21 टीएमसी पाणी | पुढारी

कोल्हापूर : धरणात केवळ 21 टीएमसी पाणी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जून महिन्यातील 13 दिवस उलटले तरीही पाऊस नाही. यामुळे पाण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. धरणातील पाणीसाठाही कमी होत चालल्याने ऐन जून महिन्यात प्रशासनाला उपसाबंदी करावी लागत आहे.

जिल्ह्यात चार मोठे, आठ मध्यम तर लघू प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पांची अशा एकूण प्रमुख 15 प्रकल्पांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील या प्रकल्पात सध्या केवळ 21.13 टी.एम.सी. पाणीसाठा आहे. गतवर्षी आजअखेर (दि.13 जून) हाच पाणीसाठा 28.16 टक्के इतका होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. गतवर्षी आजअखेर या सर्व धरणक्षेत्रात सरासरी 48 मि.मी. इतका पाऊस झाला होता. यावर्षी 1 जूनपासून 13जून पर्यंत धरणक्षेत्रात सरासरी अवघा 5 मि.मी. पाऊस झाला आहे. पाऊसच नसल्याने धरणात पाण्याची आवक अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे शिल्लक पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे.

जिल्ह्यातील दि.13 जूनपर्यंतची आजची व गतवर्षीची स्थिती

* धरणातील पाणीसाठा : 21.23 टी.एम.सी.
* गतवर्षीचा पाणीसाठा : 28.16 टी.एम.सी.
* एकूण क्षमतेच्या तुलनेत पाणीसाठा : 23.02 टक्के
* गतवर्षीचा पाणीसाठा : 30.68 टक्के
* राधानगरीतील पाणीसाठा : 21.65 टक्के
* गतवर्षीचा राधानगरीतील पाणीसाठा : 28.94 टक्के
* वारणेतील पाणीसाठा : 33.81 टक्के
* गतवर्षीचा वारणेतील पाणीसाठा : 31.89 टक्के
* दूधगंगेतील पाणीसाठा : 24.61 टक्के
* गतवर्षीच्या दूधगंगेतील पाणीसाठा : 26.34 टक्के

कोल्हापुरात अवघा 2 मि.मी.पाऊस

कोल्हापूर शहरात दि. 1 दि. 13 जून या कालावधीत एकूण अवघ्या 2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत कोल्हापूर शहरात 76 मि.मी. पाऊस झाला होता.

Back to top button