कोरोना मृतांच्या वारसांची ५० हजारांसाठी फरफट; वर्षभरानंतरही अनुदान पदरी पडेना | पुढारी

कोरोना मृतांच्या वारसांची ५० हजारांसाठी फरफट; वर्षभरानंतरही अनुदान पदरी पडेना

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या महासंकटात घरातील कर्ता पुरूष, पती गमावलेल्या एकल महिलांसह कोरोना मृतांच्या वारसांची राज्य सरकारच्या ५० हजार रूपये सहायक अनुदानासाठीची फरफट दीड वर्षानंतरही अद्याप थांबलेली नाही.

कोरोना महामारीत कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास ५० हजार रूपये इतके अनुदान सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीतून देण्यासाठी राज्य शासनाने २६ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली होती. या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने अनुदान वाटपाबाबतची कार्यपद्धती, पात्रतेचे निकषही जाहीर केले होते. त्याप्रमाणे कोरोना मृतांच्या नातेवाईक, विभागांतर्गत सुरू केलेल्या वेब पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज भरले.  या विभागाने माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीनुसार ८ जून २०२२ पर्यंत महाराष्ट्रात कोरोना मृतांची संख्या सुमारे १ लाख ४७ हजार ८८६ इतकी होती. या तुलनेत सहायक अनुदानासाठी सुमारे २ लाख ५२ हजार २०५ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. यातील १ लाख ८९ हजार ६१२ अर्ज मंजूर करून त्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले.

यातील ८ हजार ५४२ अर्ज प्रलंबित होते. ६ मे २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील कोरोना मृतांची संख्या सुमारे १ लाख ४८ हजार ५३४ वर पोहचली आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर तसेच बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे संदेश काही जणांना मोबाईलवर आले असले तरी अजूनही अनेकांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत.

Back to top button