नागपूर-पुणे रेल्वे मार्गावर चोरीचे प्रमाण वाढले, गरीबरथमधून ८ लाखाचा ऐवज लंपास
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेतून एप्रिल महिन्यात चोरी झालेल्या ५५ लाखांच्या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू आहे. आता पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी प्रवाशाची ८ लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग लंपास केली आहे. त्यामुळे आता या रेल्वेमार्गावर प्रवाशामध्ये भीतीचे वातावरण निमार्ण झाले आहे. या मार्गावील सुरक्षा वाढविण्याचा निर्णय रेल्वे पोलीसांनी घेतला आहे.
गेल्या काही दिवसात रेल्वेगाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गरीबरथ ही तशी सुरक्षित गाडी समजली जाते. मात्र, याच गाडीत हा चोरीचा प्रकार घडला. मोहनीश जैन (वय ३५) असे फिर्यादीचे नाव आहे. ते आपल्या कुटुंबीयांसह गरीबरथमधून नागपूरला येत होते. प्रवासात चोरट्यांनी त्यांची बॅग लांबवली. यात ७२ हजार रुपयांचा आयफोन, १० हजार रुपयांचा मोबाईल, व दागिने असा ८ लाख रुपयांचा ऐवज होता.
नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच मोहनीश यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर ते शेगावदरम्यान चोरी झाल्याने हे प्रकरण शेगाव पोलिसांकडे पाठविण्यात आले. एप्रिलमध्ये मुंबई-हावडा मेलमधून ५५ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. त्या घटनेचा अजूनही छडा लागला नाही. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वेच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांना गाड्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा