नाशिक विभागाला ‘उभारी’ उपक्रमासह 9 पुरस्कार | पुढारी

नाशिक विभागाला ‘उभारी’ उपक्रमासह 9 पुरस्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2021-22 अंतर्गत विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांच्या ‘उभारी’उपक्रमासह नाशिक विभागाला विविध गटांमध्ये नऊ पुरस्कार घोषित झाले आहेत. प्रशासनातील सेवांची गुणवत्ता वाढ, लोकाभिमुखता व निर्णय क्षमतेसाठी व सर्वांच्या सहकार्य यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा राबविण्यात येते. ही स्पर्धा चार गटांत घेऊन तालुका, जिल्हा, विभाग व राज्य अशा स्तरावर अभियान व स्पर्धा घेण्यात आली. या अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये, अधिकारी व सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम सूचविणार्‍या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचार्‍यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येते.

2021-22 अंतर्गत अभियानातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव या गटात विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांना तिसर्‍या क्रमांकाचे चार लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या कार्यालयाने कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी ‘उभारी’ उपक्रम प्रभावीपणे राबविला. तसेच पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रणाली बसवून ऊर्जेची बचत करीत पर्यावरणाचे संवर्धन, वॉटर हार्वेस्टिंगचा वापर, कार्यालयास हरित इमारतीचे प्रमाणपत्र, मोफत सातबारा उतार्‍याचे वाटप आदी कार्यक्रम राबविले आहेत.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2021-22 मध्ये नाशिक विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. अधिकारी व कर्मचार्‍यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे नाशिक विभागातील अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे पुढीलवर्षी विभागातील पुरस्कार विजेत्यांची संख्या अधिक राहील, असा मला विश्वास आहे. – राधाकृष्ण गमे, आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक.

हेही वाचा:

Back to top button