नाशिक : दोघी “रंजना” आजही खंबीरपणे लोकांचे प्रतिनिधित्व करत आहे… | पुढारी

नाशिक : दोघी "रंजना" आजही खंबीरपणे लोकांचे प्रतिनिधित्व करत आहे...

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ : कुटुंबाची देखभाल, शेतीची मशागत अशा प्रकारची कामे सुरू असतानाच, अचानक महापालिका निवडणुकीची उमेदवारी करण्यासाठी विचारणा झाल्याने सुरुवातीला तारांबळ उडाली. परंतु, कुटुंबीयांच्या खंबीर पाठिंब्याने निवडणूक लढण्याचे बळ महापालिकेच्या पहिल्या आणि दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवार रंजना भानसी आणि रंजना बोराडे यांना मिळाले. विशेष म्हणजे या दोघी आजही खंबीरपणे लोकांचे प्रतिनिधित्व करत आहेत.

1982 ते 1992 अशी 10 वर्षे प्रशासकीय राजवटीनंतर 1992 ला नाशिक महापालिकेची पहिली निवडणूक झाली. यात अर्थातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व राहिले. नाशिकच्या पहिल्या महापौरपदी विराजमान होण्याचा बहुमान शांतारामबापू वावरे यांना मिळाला. याच पहिल्या निवडणुकीतून काँग्रेसच्या उमेदवार रंजना बोराडे या दसक-पंचक या ग्रामीण भागातून निवडून आल्या. त्या सध्या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका असल्या, तरी काँग्रेस पक्षातून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. कधी त्या स्वत:, तर कधी त्यांचे पती (स्व.) प्रकाश बोराडे यांनी या भागाचे नेतृत्व केले. मोठे खटले असलेल्या बोराडे परिवारात रंजनाताईंचा संसार सुरू झाला. कुटुंबाबरोबरच शेती मशागतीची कामे करीत असतानाच सासरे दामोदर बोराडे आणि शंकरराव नाना बोराडे तसेच वडील दत्तात्रय थापेकर आणि काका (स्व.) गोपाळराव गुळवे यांनी रंजनाताईंना निवडणुकीसाठी आग्रह केला. कुटुंबाची साथ म्हटल्यावर त्यांनी निवडणूक रिंगणात उतरत पहिल्याच निवडणुकीत विजय संपादन केला.

भाजपचे माजी खासदार (स्व.) कचरूभाऊ राऊत यांची कन्या नाशिकच्या माजी महापौर रंजना भानसी या गेल्या 25 वर्षांपासून म्हसरूळ भागातील नेतृत्व करीत आहेत. वडिलांबरोबर प्रचारामध्ये सहभागी होत असल्याने भाजपचे नेते (स्व.) प्रभाकर तथा बंडोपंत जोशी आणि माजी मंत्री (स्व.) दौलतराव आहेर यांनी कचरूभाऊंकडे कन्येला मनपा निवडणुकीत उमेदवारी करण्याचा आग्रह धरला.

‘तू फक्त लढ’ या वाक्याने दिला धीर
घरात मुले लहान असल्याने त्यांच्या संगोपनापोटी रंजना भानसी यांनी थेट नकारच दिला. परंतु, ‘आम्ही आहोत तू फक्त लढ’ या कुटुंब तसेच नेत्यांच्या एका वाक्याने त्यांना मोठा धीर दिला अन् त्यांनी होकार दिला. आजतगायत भानसी या महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना भाजपने महापौरपदी विराजमान केले. त्यांचे बंधू दिलीप राऊत यांच्यासह त्या काळचे आर. डी. कुलकर्णी, मनोज बाग, रवि साळुंके, हरिभाऊ पटेल, प्रवीण पोकार, अरुण नेवासकर, अशोक जाधव, ताईबा हटकर यांच्या पाठबळानेच आज आपण नगरसेवक असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button