आला उन्हाळा; तब्येत ‘अशी’ सांभाळा…! | पुढारी

आला उन्हाळा; तब्येत ‘अशी’ सांभाळा...!

नवी दिल्ली : उन्हाळा म्हणजे तीव्र सूर्यप्रकाश, घाम आणि आर्द्रता यांचा हंगाम. उष्णतेमध्ये आपल्याला काही खावेसे वाटत नाही आणि बाहेर कुठेही जावेसे वाटत नाही. दिवसभर नुसते पाणी प्यावेसे वाटते. पोट आणि पचनाशी संबंधित समस्या उन्हाळ्यात सर्वाधिक होतात.

थोड्याशा निष्काळजीपणामुळे ताप, खोकला आणि पोटाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात तुमची दैनंदिन दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींची खूप काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या जीवनशैलीत कोणते बदल करावेत, याबाबत तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती…

हलके आणि सुती कपडे घाला : उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी हलक्या रंगाचे कपडे वापरावेत. हलके रंग डोळ्यांना थंडावा देतात. उन्हाळ्यात कापूस, शिफॉन, क्रेप किंवा जॉर्जेटसारखे पातळ कपडे घालावेत. या कपड्यांमध्ये हवा सहज जाते आणि घामही लवकर सुकतो. सुती कपडे त्वचेचे संक्रमण आणि उष्णतेच्या पुरळांपासूनदेखील संरक्षण करतात.

ताजे आणि हलके अन्न खा : उन्हाळ्यात आहाराची अधिक काळजी घ्यावी. हलक्या आणि सहज पचणार्‍या गोष्टी खाव्यात. जेवढी भूक आहे त्यापेक्षा थोडे कमी खा. जास्त तेल आणि मसाले असलेले अन्न खाणे टाळा.

शक्य तितक्या फळांचे सेवन करावे : आपल्या आहारात संत्री, टरबूज, खरबूज, द्राक्षे आणि आंबा यांसारखी रसदार फळे असावीत. यांच्या मदतीने शरीरातील पाण्याची कमतरता सहज भरून काढता येते.

शरीराला हायड्रेट ठेवा : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे सर्वात आवश्यक आहे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे. याशिवाय ज्यूस, दही, दूध, ताक, लस्सी, लिंबूपाणी, नारळपाणी प्यायला हवे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता सहज भरून निघू शकते.

पुरेशी झोप घ्या : उन्हाळ्यात पुरेशी झोप महत्त्वाची आहे. अनेक वेळा अति उष्णतेमुळे नीट झोप येत नाही, त्यामुळे चिडचिड होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज भासते तेव्हा झोप घ्यावी!

Back to top button