T20 World Cup दरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका, उत्तर पाकिस्तानातून मिळाली धमकी | पुढारी

T20 World Cup दरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका, उत्तर पाकिस्तानातून मिळाली धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी२० (T20) विश्वचषक स्पर्धेचे सह-यजमान असलेल्या वेस्ट इंडिजला उत्तर पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ने माहिती दिली की स्पर्धेसाठी सर्व सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कॅरिबियन बेटांना उत्तर पाकिस्तानमधून उद्भवणाऱ्या संभाव्य दहशतवादाच्या धोक्यांबाबत सतर्क करण्यात आले आहे.

T20 विश्वचषक स्पर्धा १ ते २९ जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. वेस्ट इंडिज अँटिग्वा आणि बार्बुडा, बार्बाडोस, गयाना, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट, ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणार आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि टेक्सास या शहरांमध्येही सामने होत असले तरी अमेरिकेतील सामन्यांदरम्यान कोणताही धोका होण्याची चिन्हे नाहीत. दोन उपांत्य फेरीतील सामने त्रिनिदाद आणि गयाना येथे होतील. तर अंतिम सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे.

एका वृत्तानुसार, प्रो-इस्लामिक स्टेट (IS) ने क्रीडा स्पर्धांदरम्यान हिंसाचार भडकावण्याच्या उद्देशाने कारवाया सुरू केल्या आहेत. ज्यात आयएस- खोरासन (IS-K) च्या अफगाणिस्तान-पाकिस्तानातील शाखेच्या व्हिडिओ संदेशाचा समावेश आहे. त्यामध्ये अनेक देशांमधील हल्ल्यांचा उल्लेख आहे आणि त्यांनी त्यांच्या समर्थकांना युद्धाच्या मैदानात सामील होण्यासाठी आ‍वाहन केले आहे.

दरम्यान, T20 विश्वचषक २०२४ दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याच्या मुद्द्यावर बोलताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC)म्हटले आहे की, “आम्ही यजमान देश आणि शहरांमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून जवळून काम करत आहोत. या स्पर्धेदरम्यान कोणताही धोका होऊ नये म्हणून आम्ही योग्य योजना तयार केल्या आहेत. याची खात्री करण्यासाठी आम्ही सतत जागतिक परिस्थितीचे निरीक्षण करतो आणि त्याचे मूल्यांकन करतो.”

वेस्ट इंडीज बोर्डाने म्हटल आहे की, “आम्ही सर्व भागधारकांना खात्री देऊ इच्छितो की ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान सुरक्षेला आमचे पहिले प्राध्यान्य राहील. आमच्याकडे एक व्यापक आणि मजबूत सुरक्षा योजना आहे.”

टी-२० विश्वचषकासाठी देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. क्रिकेटमधील सर्वात मोठा महामुकबवला जूनमध्ये होणार आहे. या र्स्पधेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

टी२० विश्वचषक सामने कसे होणार?

यावेळी T20 World Cup स्पर्धेचे वेस्ट इंडिज आणि अमेरिका यजमान आहेत. जिथे T-20 विश्वचषक सामने खेळवले जातील. सर्व २० संघांची ५- ५ च्या ४ गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सुपर ८ मध्ये पोहोचतील. यानंतर सुपर ८ फेरीत ८ संघांमध्ये सामने होतील. सुपर ८ मध्येही संघांना ४-४ अशा दोन गटात ठेवण्यात येणार आहे. सुपर ८ मध्ये दोन्ही गटातील टॉप २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. दोन उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. यानंतर उपांत्य फेरीतील सामने जिंकणारे संघ अंतिम फेरीत खेळतील.

हे ही वाचा ;

Back to top button