रायबरेलीत राहुल गांधींसाठी अखिलेश यांची रसद महत्त्वाची | पुढारी

रायबरेलीत राहुल गांधींसाठी अखिलेश यांची रसद महत्त्वाची

अजय सेतिया

अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. तेथे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाकडून पुरवली जाणारी रसद त्यांच्यासाठी मोलाची ठरणार आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी आजदेखील काँग्रेसचा परंपरागत मतदार असल्यामुळे त्याचाही फायदा राहुल यांना होणार आहे. त्यांची लढत भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांच्याशी होणार आहे.

वायनाडमधील मतदान संपताच राहुल यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे स्वाभाविक म्हटले पाहिजे. त्यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवली नसती तर त्यांना पंतप्रधानपदाचे गंभीर उमेदवार मानले गेले नसते. शिवाय राहुल हे प्रचार सभांतून सातत्याने मोदी यांना लक्ष्य करत आहेत. भारतीय राजकारणात आजही उत्तर प्रदेशचे महत्त्व अबाधित आहे. म्हणूनच मोदी यांनीही दोन वेळा वाराणसी मतदारसंघातून आतापर्यंत निवडणूक लढवली आहे. देशात आतापर्यंत झालेल्या पंधरा पंतप्रधानांपैकी नऊ जणांनी उत्तर प्रदेशातील मतदारसंघांतून निवडणूक जिंकली आहे.

राहुल यांचे आजोबा फिरोज गांधी यांच्याप्रमाणेच इंदिरा गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधी यांनीही रायबरेलीतून निवडणूक लढवली होती. खरे तर खुद्द राहुल हेही तीनदा अमेठीतून लोकसभेवर निवडून गेले होते. या पार्श्वभूमीवर, अमेठीच्या तुलनेत रायबरेली सुरक्षित मतदारसंघ आहे, असे काँग्रेसच्या धुरिणांना वाटते. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असाही एक मतप्रवाह होता की, राहुल यांनी रायबरेलीतून आणि प्रियांका यांनी अमेठीतून निवडणूक लढवावी. तो विचार मागे पडला आणि हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून प्रियांका यांनी निवडणूक लढवावी, यावर चर्चा झाली. मात्र, प्रियांका यांनी त्यास नकार दिला. आता गांधी कुटुंबाची रणनीती अशी आहे की, राहुल हे वायनाडमधून जिंकले तर तेथे होणार्‍या पोटनिवडणुकीत प्रियांका यांना संधी द्यायची. तसे संकेत काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिले आहेत.

अमेठीतही तुल्यबळ लढत

अमेठीतून आता सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणार्‍या किशोरी लाल शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून सोनिया यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना प्रदेश पातळीवरील पदाधिकारीपदी बढती देण्यात आली. अमेठी मतदारसंघातील सगळ्या खाचाखोचा त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासाठी अमेठीतील सामना वाटतो तेवढा सोपा राहिलेला नाही.

रायबरेली लोकसभा मतदारसंघात येणार्‍या विधानसभेच्या पाच मतदारसंघांचा विचार केला तर चार ठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. रायबरेली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या अदिती सिंह विजयी झाल्या होत्या. राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा काँग्रेस व समाजवादी पार्टीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. काँग्रेसचा परंपरागत मतदार आणि समाजवादी पक्षाचे सहकार्य यामुळे राहुल यांना रायबरेलीतूनही विजयाची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Back to top button