नागपूर : कोळसा व्यापाऱ्याकडे १ कोटीच्या खंडणीची मागणी; तीन तोतया पत्रकारांसह चौघे गडाआड | पुढारी

नागपूर : कोळसा व्यापाऱ्याकडे १ कोटीच्या खंडणीची मागणी; तीन तोतया पत्रकारांसह चौघे गडाआड

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर तब्बल १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास बदनाम करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली आहे. पीयूष पुरोहित, राष्ट्रभान पोर्टलचा पत्रकार संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील कोळसा व्यापारी गुप्ता यांना गेल्या काही दिवसांपासून तोतया पत्रकार पीयूष पुरोहित, वंश अग्रवाल, मध्यप्रदेशातील शिवनी येथील राष्ट्रभान डॉट इन या पोर्टलचा संजय बघेल, संजीत बघेल हे चौघेही एक कोटी रुपयांची खंडणी मागत होते. पीयूष आणि बघेल हे दोघेही गुप्ता यांच्याविषयी बदनामीकारक बातम्या प्रकाशित करीत होते. त्यामुळे गुप्ता यांनी दिवानी न्यायालयात बघेल बंधूंना खेचले होते. न्यायालयाने दोघांनाही कोणतेही वृत्त प्रकाशित न करण्याच्या अटीवर सोडले होते.

मंत्र्यांच्या ओएसडीच्या नावे फोन

या घटनाक्रमानंतर चौघांनी गुप्ता यांना खंडणी मागण्याचा नवा कट रचला. वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार याने गुप्ता यांना केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांचे विशेष कार्यासन अधिकारी (ओएसडी) यांच्या नावाने फोन केला. कोळसा व्यापारात काही बनावट कागदपत्र वापरल्याचा आरोप करीत एक कोटीची खंडणी मागितली. आरोपींनी गुप्ता यांच्या पुतण्याची भेट घेऊन १० लाखांची मागणी केली. गुप्ता यांनी खंडणी देण्यास नकार देत थेट नागपूर सायबर पोलिसांत तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी तपास करीत आरोपी तोतया पत्रकार पीयूष पुरोहित, संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल यांना अटक केली.

अधिक वाचा :

Back to top button