पंढरपूर : विठ्ठलाच्या पादुकांचे संत सावता महाराजांच्या अरणकडे प्रस्थान | पुढारी

पंढरपूर : विठ्ठलाच्या पादुकांचे संत सावता महाराजांच्या अरणकडे प्रस्थान

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून सर्व संतांचे पालखी सोहळे पंढरपूरमध्ये येत असतात, मात्र याला अपवाद असतो तो संत सावता माळी यांचा पाळखी सोहळा. आपल्या काळ्या आईला विठ्ठल मानून भक्ती करणारे संत सावता महाराज कधीच पंढरपूरला येत नसत. त्यामुळेच आपल्या या लाडक्या भक्ताच्या भेटीला स्वतः विठ्ठल जातात, अशी मान्यता वारकरी संप्रदायात आहे. परंपरेनुसार गुरुवार, दि. 13 रोजी विठुरायाच्या पादुका शेकडो वारकर्‍यांसमवेत अरणकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

‘कांदा मुळा भाजी… अवघी विठाई माझी…’ म्हणत आपल्या शेतात काबाडकष्ट करणार्‍या सावता महाराजांच्या तोंडात कायम विठ्ठलाचे नामस्मरण असे. माढा तालुक्यातील अरण हे सावता महाराजांची जन्म आणि कर्मभूमी आहे. येथे काळ्या आईची सेवा करताना सावता
महाराजांनी अनेक अजरामर अभंग रचना केल्या आहेत. संत आपल्याकडे येत नाही म्हणून मग देव स्वतः सावता महाराजांच्या भेटीला जात असतो. आषाढी एकादशीनंतर येणार्‍या कृष्ण पक्षाच्या एकादशीला पंढरपुरातील काशीकापडी समाज या पादुका घेऊन जात असतो. देवाच्या या पादुका शेकडो वर्षांपासून या समाजाकडे असल्याने हा समाज वारकर्‍यांसमवेत देवाच्या पादुका रथात घेऊन अरणकडे जात असतो.

त्यानुसार गुरुवारी सकाळी शेकडो वारकर्‍यांच्या उपस्थितीत काशीकापडी समाजाच्या मठात असणार्‍या पादुका पालखीत घेऊन वाजतगाजत मुख्य मार्गावरील रथात ठेवण्यात आल्या. यानंतर नगरप्रदक्षिणा करत या पादुका विठ्ठल मंदिरात आणून देवाजवळ ठेवण्यात आल्या. यानंतर देवाच्या या पालखी सोहळ्याने ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात अरणकडे प्रस्थान ठेवले. आता रोपळे, आष्टी असे मुक्काम करत संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीदिवशी म्हणजे आषाढ कृष्ण चतुर्दशीला अरण येथे पोहोचते. या दिवशी संत आणि देव भेटीचा अनोखा सोहळा अरण येथील सावता महाराजांच्या मंदिरात पार पडतो. दुसर्‍या दिवशी म्हणजे पौर्णिमेला इथे श्रीफळ हंडी आणि काल्याचा कार्यक्रम करून पुन्हा देव पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात.

संतांच्या भेटीला साक्षात पांडुरंग जातात, अशा या अनुपम सोहळ्याची व्याप्ती वाढवण्यासाठी मंदिर समिती आणि प्रशासनाने प्रयत्न करावेत. दरवर्षी सावता परिषदेकडून या पालखीत सहभाग नोंदविला जात असतो. देव संतांच्या भेटीला जाणे हा सर्वात मोठा सोहळा आहे. याकडे मंदिर समिती आणि प्रशासन यांनी दुर्लक्ष न करता वारकरी संप्रदायाच्या या अनोख्या सोहळ्यासाठी सर्व सोयी पुरविण्याची मागणी केली आहे.
– कल्याण आखाडे,
अध्यक्ष, सावता परिषद

सावता माळी हे पांडुरंगाच्या भेटीला आले नव्हते म्हणून आज एकादशीला नगर प्रदक्षिणा करून पादुका पालखी आढीवमार्गे रोपळे, आष्टी असे दोन मुक्काम करून अरणला पोहोचते. पाऊस पडू द्या, शेतकरी सुखी राहू द्या, असे साकडे पांडुरंगाला घातले आहे.
– नागेश गंगेकर,
माजी नगरसेवक

Back to top button