राज्यघटना बदलण्यासाठीच भाजपाचा ‘चारशे पार’चा नारा : चंद्रकांत हंडोरे | पुढारी

राज्यघटना बदलण्यासाठीच भाजपाचा 'चारशे पार'चा नारा : चंद्रकांत हंडोरे

मंद्रुप, पुढारी वृत्तसेवा : देशाची राज्यघटना बदलण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. म्हणून भाजपाकडून ‘अब की बार चारशे पार’ च्या घोषणा देण्यात येत आहे. लोकशाही धोक्यात आणून राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव असून त्यासाठी चारशे खासदार निवडून आणण्याचा खटाटोप सुरु आहे, अशी जळजळीत टीका करत लोकशाही संवर्धनासाठी काँग्रेसला विजयी करा, असे आवाहन खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी मंगळवारी (दि.३०) केले. कंदलगाव येथील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीरसभेत ते बोलत होते.

हंडोरे पुढे म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई आहे. भाजपाकडून काँग्रेसवर आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेची दिशाभूल करून शेतकर्‍यांच्या खात्यावर १५ लाख रूपये, बेरोजगारांना नोकरी, शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव, अशी आश्वासने दिली होती. दहा वर्षात पंतप्रधान मोदीनी दिलेल्या या गॅरंटीचे काय झाले ? असा सवालही खासदार हंडोरे यांनी यावेळी केला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे, जिल्हा संघटक रमेश हसापुरे, अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद झळके , काँग्रेस तालुका उपाध्यक्ष मोतीलाल राठोड, भारत जाधव, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अनंत म्हेत्रे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button