सातारा : ‘ई-पीक पाहणी’त सातारा तालुका अव्वल | पुढारी

सातारा : ‘ई-पीक पाहणी’त सातारा तालुका अव्वल

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून शेतकर्‍यांनी केलेला पेरा थेट शासनाकडे नोंदवला जात आहे. जिल्ह्यात सातारा तालुका ई-पीक पाहणीत प्रथम क्रमांकावर आहे. तालुक्यात 10 टक्के खातेदार शेतकर्‍यांनी ई पीक पाहणी’ची नोंदणी केली आहे. सातारा तहसीलदार राजेश जाधव व त्यांच्या टीमने सुट्टीच्या दिवशीची शेतकर्‍यांच्या बांधावर जावून ई -पीक पाहणीचे काम केले.

ई -पीक पाहणीला 1 ऑगस्टपासून राज्यभर सुरुवात झाली. याच ‘ई- पीक पाहणी’नुसार नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही ‘ई पीक पाहणी’ प्रत्येक खातेदार शेतकर्‍यांनी करणे आवश्यक आहे. ई- पीक पाहणी’ची शेतामध्ये लगबग सुरू आहे. सातारा तहसीलदार राजेश जाधव यांनी सुट्टीतही ‘ई पीक पाहणी’चे कार्यक्रम राबवले आहेत. तहसीलदार राजेश जाधव व त्यांची टीम बांधावर जावून शेतकर्‍यांना ई पीक पाहणीचे महत्त्व पटवून देत आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ‘ई पीक पाहणी’त सातारा तालुका अव्वल ठरला आहे.

प्रक्रियेबाबत शेतकर्‍यांना माहिती व्हावी म्हणून महसूल विभागातर्फे सांगण्यात आले की, शेतकर्‍यांना प्ले स्टोअरमधून ‘ई -पीक पाहणी व्हर्जन 2’ असं नाव टाकून हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर हे अ‍ॅप ओपन केल्यानंतर ‘ई पीक पाहणी’ नावाचे होम पेज सुरु होते. यामध्ये शेतकर्‍यांनी आपल्या महसूल विभागाची नोंद करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर नवीन खातेदार नोंदणी हा पर्याय निवडावा. खातेदार माहिती भरताना विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव हे पर्याय निवडावेत. त्यानंतर शेतकर्‍यास आपले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक भरुन ‘शोधा’ या पर्यायावर क्लिक करावे. सांकेतिक नंबर टाकल्यावर प्रत्यक्ष ‘ई-पीक पाहणी’ ची प्रक्रिया सुरू होते.

होमपेजवरील ‘पीक माहिती नोंदवा’ हा पर्याय निवडावा लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अक्षांश-रेखांश मिळवावा लागणार आहे. त्यानंतर शेतकर्‍याला आपण निवडलेल्या गटात जावून पिकाचा फोटो काढून तो अपलोड केला की सहमती विचारली जाते. ‘ओके’ या बटणावर क्लिक केल्यानंतर माहिती अपलोड होते आणि ई- पीक पाहणीही पूर्ण होते.

 

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, महसूल उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ई पीक पाहणीचे काम सुरू आहे. ई पीक पाहणी नोंदणीमुळे शेतकर्‍यांना अतिवृष्टीसह इतर आपत्ती काळात शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई पीक विम्म्याच्या स्वरुपात देण्यास मदत होणार असून सात-बारावर पिकाची नोंदणी असेल तर बँकेकडून कर्जपुरवठा होऊ शकतो.
-राजेश जाधव, तहसीलदार, सातारा

 

Back to top button