आपत्तीग्रस्त गावांना खबरदारीचे आवाहन
पाटण : पुढारी वृत्तसेवा
पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांसह अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागणार्या गावांची पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारी व उपाययोजनांसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य व प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाटणचे उप विभागीय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली.
गतवर्षी तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी येथे झालेल्या भूस्खलनामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याची पाहणी महसूल, कृषी, बांधकाम आदी संबंधित विभागांच्या अधिकार्यांसह व स्थानिकांच्या समवेत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रमेश पाटील , तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे, आदी संबंधित विभागांचे अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. आंबेघर तर्फ मरळी (वरचे) या ठिकाणी भेट देऊन गतवर्षी भुसख्खलन झालेल्या भागाची पाहणी केली. नागरिकांशी चर्चा करून त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या गावाकडे येणार्या रस्त्याच्यावरील दगड काढणे आव्हानात्मक काम असून संबंधित विभागास उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.