सातारा : भाविकांची संख्या विचारात घेऊनच सुविधांचे नियोजन : पालकमंत्री
लोणंद; पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दि. 28 जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. वारकरी व भाविकांना सुविधा पुरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सर्व यंत्रणा चांगले काम करत आहे. दोन वर्षांच्या कालखंडानंतर होणार्या पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पार्श्वभूमीवर निरा दत्त घाट, लोणंद पालखी तळ, पालखी मार्गाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, शिवाजीराव जगताप, तहसीलदार दशरथ काळे, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, नगराध्यक्षा सौ. मधुमती पलंगेे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके शेळके, मुख्याधिकारी संजय गायकवाड, आयएमएचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, सपोनि विशाल वायकर व मान्यवर उपस्थित होते.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, पालखी सोहळा कोणतीही अडचण न येता व दिंडी, वारकरी, भाविक यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहेत. वारकरी व भाविकांना पाणी, वीज, आरोग्य, सुरक्षा आदी सुविधा चांगल्या प्रकारे पुरविण्यात येण्याचे नियोजन केले जात आहे. माऊलींचे सातारा जिल्ह्याच्यावतीने स्वागत करण्यात येते त्या ठिकाणीही योग्य नियोजन करून गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली जावी. माऊलींना अभ्यंग स्नान घालण्यात येते. त्या ठिकाणीही गर्दी होणार नाही याचे नियोजन व्हावे. पाहणीदरम्यान ना. पाटील यांनी विविध विभागांकडून खातेनिहाय कामाचा आढावा घेतला.
दरम्यान, माऊलींच्या पालखी सोहळ्यातील लोणंद शहरात स्वच्छतेची कामे करताना खेमावती नदीची स्वच्छता करण्याच्या कामासाठी राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. गजेंद्र मुसळे यांनी विना मोबदला पोकलॅनमशीन दिल्याबद्दल पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. नगराध्यक्षा सौ. मधुमती पलंगे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके, मुख्याधिकारी संजय गायकवाड व नगरसेवकांनी चांगले नियोजन केल्याचेही ना. पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगरसेवक भरत शेळके,सागर शेळके, गणीभाई कच्छी, भरत बोडरे, लक्ष्मणराव शेळके, असगर इनामदार, दयानंद खरात, अॅड. सुभाषराव घाडगे, सागर गालिंदे, अॅड. गणेश शेळके, अॅड. गजेंद्र मुसळे, बंटी खरात, बाळासाहेब शेळके व अधिकारी उपस्थित होते.