तांत्रिक अडचण आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या : जयंत पाटील | पुढारी

तांत्रिक अडचण आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या : जयंत पाटील

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  फक्त तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री आ. जयंत पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना लिहिले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क अंतर्गत सहायक आणि लिपिक टंकलेखक या पदाकरिता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, टंकलेखनाच्या ऑनलाईन चाचणीदरम्यान उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत आयोगामार्फत टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे पत्रक आयोगाने निर्गमित केले आहे. याच महत्त्वाच्या प्रश्नाकडे आ. जयंत पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे लक्ष वेधले आहे. टंकलेखनाच्या ऑनलाईन चाचणीदरम्यान फार कमी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांचीच चाचणी पुन्हा घ्यावी. टंकलेखन कौशल्य चाचणी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करून अशा विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून दिलासा द्यावा.

Back to top button