प्रगतीच्या वाटांसाठी महायुतीला निवडून द्या : इंदापूरमधील सभेत अजित पवारांचे मतदारांना साकडे | पुढारी

प्रगतीच्या वाटांसाठी महायुतीला निवडून द्या : इंदापूरमधील सभेत अजित पवारांचे मतदारांना साकडे

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : आपल्या स्वतःचं, आपल्या पुढच्या पिढीचे नुकसान टाळण्यासाठी तसेच त्यांना प्रगतीच्या वाटा उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीला मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथे रविवारी (दि. 5) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत केले. या वेळी पुसदचे आमदार इंद्रनील नाईक, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने, प्रवीण माने, प्रदीप गारटकर, अंकिता पाटील, नवनाथ पडळकर, राजवर्धन पाटील, शशिकांत तरंगे, कल्याण आखाडे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, खासदाराने लोकसभेचा निधी मतदारसंघात आणायचा असतो, रेल्वेचे प्रश्न सोडवायचे असतात. मात्र, नकारात्मक दृष्टीने राजकारण केले गेले, ते फार काळ टिकत नाही. राहुल कुल, दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे असे आम्ही सर्व एकत्र आलो आहोत ते केवळ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी. मागे तीनवेळा आम्हीच निवडून दिले पण त्यांची 15 वर्षांची कारकीर्द आणि सुनेत्रा पवार यांची 5 वर्षांची कारकिर्दीतच तुमचा विकास करून दाखवीन. तुम्हाला पाणी मिळवून दाखवीन, मला सर्वांनी साथ द्या, बारामतीच्या धर्तीवर इंदापूरचा विकास करून दाखवेल, असा शब्द अजित पवार यांनी दिला.

ही निवडणूक गावकी-भावकी व भावनिकतेची नसून, पुढच्या पिढीच्या प्रपंचाची आहे. यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल. यामध्ये महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल आणि यात बारामतीचाही खासदार असेल. त्यामुळे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजय करण्याचे आवाहन केले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, पदासाठी राजकारण, समाजकारण करणारी आम्ही माणसं नाही. इंदापूर तालुक्याचा विकास करायचा असल्याने मागचे सर्व विसरून अजित पवार, देवेंद्र फडणवीस आदी आम्ही सगळे एकत्र आलो. त्यामुळे दादा आता तुमची, देवेंद्र फडणवीस आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जबाबदारी अधिक आहे. आम्ही फक्त एकच काम करणार, ते म्हणजे 7 तारखेला घड्याळासमोरच बटन दाबायचं, सुनेत्रा पवार यांना निवडून द्यायचं म्हणजे आपलं काम झालं.

आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, पाण्याचा प्रश्न सोडवण्याची धमक केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्येच आहे. इंदापूर तालुक्याचे उजनीचे पाणी कमी झालेले आहे. खडकवासल्याचे पाणी योग्य प्रकारे मिळत नाही. निरा डावा कालव्याचे पाणी कमी झाले आहे आणि हे पाणी आपल्याला पुन्हा पाहिजे असेल, तर महायुतीचा उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांना विजयी करावे लागणार आहे. या वेळी महायुतीच्या घटक पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button