माझा आत्मा जनतेसाठी अस्वस्थ होतो : शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर | पुढारी

माझा आत्मा जनतेसाठी अस्वस्थ होतो : शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : माझा आत्मा हा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही. तर शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन, असे प्रत्त्युत्तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना दिले आहे. शिरूर मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूरमध्ये ज्येष्ठ नेते, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार अ‍ॅड. राम कांडगे, दिलीप ढमढेरे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात, माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे, बाबा परदेशी, अनंतराव चौगुले, सुनील मेहेर, बाजीराव ढोले, शरद चौधरी, बाळासाहेब बाणखेले, अल्लूभाई ईनामदार, अनिल तांबे, दीपक औटी, बाबू पाटे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, किशोर दांगट, शरद लेंढे, सूरज वाजगे आदी उपस्थित होते. शरद पवार पुढे म्हणाले की, आमच्यावरचे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही. जे माझ्या बोटाला धरून राजकारणात आले, ते आता माझ्याबद्दल काय बोलतात तर ‘एक आत्मा भटकत आहे, त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी’, असे मोदी म्हणाल्याचे सांगत पवारांनी मोदींवर निशाणा साधला.

पवार म्हणाले की, पंतप्रधान काल म्हणाले ईडीचा मी एक टक्काही वापर करत नाही. जे चांगलं काम करतात त्यांच्याविरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथं अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय.

राहुल गांधींवर टीका करणार्‍या मोदींना शरद पवारांनी सुनावले खडेबोल

राहुल गांधींवर टीका करतात. शहाजादे क्या करेंगे? म्हणताना मोदींना काय तरी वाटायला हवं, अस शरद पवार म्हणाले. राहुल गांधींच्या तीन पिढ्या देशासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी झटल्या आहेत. आधुनिकतेवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणार्‍या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आजीने देशासाठी बलिदान दिलं, त्या राहुल गांधींना म्हणतात शहाजादे काय करणार? मोदी काहीही बोलताहेत. खोट्या गोष्टी सांगत आहेत. चुकीच्या पद्धतीने टीका- टिपणी करत असतील तर अशांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे.

हेही वाचा

Back to top button