पुणे ; बिबट्याच्या हल्‍ल्‍यानंतर वनविभाग जागे; उंब्रज क्र. १ येथे लावणार पिंजरे | पुढारी

पुणे ; बिबट्याच्या हल्‍ल्‍यानंतर वनविभाग जागे; उंब्रज क्र. १ येथे लावणार पिंजरे

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा जुन्नर तालुक्यातील उंब्रज क्र.१ येथे सोमवारी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आयुष सचिन शिंदे या साडेतीन वर्षाच्या बालकाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. त्याच्या घराजवळच्या परिसरात वनविभागाने आज (मंगळवार) सकाळीच १० पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी लावले जाणार असल्याची माहिती ओतूरचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली.

उंब्रज क्रमांक १ या ठिकाणी वन विभागाचे पथक दाखल झाले आहे. वनविभागाची यंत्रणा शिंदे यांच्या घराजवळ आल्यानंतर स्थानिकांनी काही प्रमाणात उद्रेक केला. वारंवार सांगूनही वन विभाग पिंजरा का लावत नाही असा सवाल देखील अधिकाऱ्यांना विचारला. एवढेच नाही तर दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने तुम्हाला पिंजरा लावण्याबाबत पत्र दिले होते व तुम्ही पिंजरा का लावला नाही? असा सवाल करत स्थानिक नागरिक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

आयुष आपल्या आजीसोबत रस्त्याने जात असताना गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला होता. चुलत्याची मोटरसायकल तिथे आल्यामुळे आयुष आजीला म्हणाला की, मी नानाच्या मोटरसायकलने येतो आणि म्हणून त्यांने आजीचा हात सोडला आणि चुलत्याच्या मोटरसायकलकडे पळत चालला असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घातली व त्याला गवतात नेले होते. घरातील सगळ्यांनीच आरडाओरड केल्याने बिबट्या आयुषला सोडून पसार झाला. विशेष म्हणजे आयुष्य स्वतः एवढ्या गंभीर जखमा असतानाही त्या गवतातून बाहेर आला. त्याच्यात डोक्याला, तोंडाला आणि कानाला गंभीर जखमा पाहून त्याला तातडीने आळेफाटा येथील दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान वारंवार मागणी करून वनविभाग जर पिंजरे लावत नसेल तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवू, असा आक्रोश स्थानिक शेतकऱ्यांचा आहे. या ठिकाणच्या बिबट्याला पकडणारच, तुम्ही काळजी करू नका, आम्हाला काम करू द्या अशी विनंती यावेळी ओतूरचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी स्थानिकांना केली. दरम्यान जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील घटनेची माहिती घेऊन स्वतः घटनास्थळाला भेट देणार असल्याचे सांगितले. तसेच वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते हे देखील घटनास्थळी भेट देणार आहेत. आम्हाला दिवसा लाईट द्या अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांची असून आम्ही आमची मुलं बाळ संभाळायची की शेतातली पीक सांभाळायची? घरीच बसून राहिलो तर आम्ही जगायचं कसं? वनविभागाने बिबट्या ही आपली संपत्ती त्यांच्याकडे घेऊन जावी, शासन नक्की करताय काय? बिबट्यांना गोळ्या घालायची आम्हाला परवानगी द्या अन्यथा आम्हाला गोळ्या घाला आक्रोश यावेळेस स्थानिक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्‍त केला.

हेही वाचा :

Back to top button