जलजीवनचे अधिकारी सांभाळताहेत ठेकेदारांना
केडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजना उभारणीचा पूर्णपणे बट्ट्याबोळ उडाला असून, योजनेचे अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत एवढी घट्ट झाली आहे, की दै. ‘पुढारी’ने यावर प्रकाशझोत टाकल्यानंतरही अधिकारी प्रशासन कोणतीही चौकशी, कारवाई करण्याच्या तयारीत नसल्याने आता या योजनांच्या कामासंदर्भात जागरूक झालेले ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. जलजीवन मिशनच्या अधिकार्यांच्या दुर्लेक्षाने मात्र कोट्यवधी रुपयांच्या खर्चानंतरही या योजनेचे तीनतेरा आणि नऊबारा वाजण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे .शुद्ध पाणी योजनेतून गढूळ तरी पाणी नळातून मिळेल का? हा प्रश्न ऐरणीवरआला आहे.
आठ गावांचे काम एकाच ठेकेदाराला दिल्याचे पाप केल्यानंतर ती कामे मुदत संपूनही पूर्ण झालेली नसताना अधिकारी मात्र ढिम्म आहेत. कोणताच जाब ठेकेदाराला विचारत नाहीत, यामुळे अधिकारी ठेकेदारांची जुगाड झाल्याची शंका व्यक्त होत आहे.
सहजपूर, मळद, नांदूर, गावडे-बगाडेवस्ती, हिंगणी बेर्डी या पाच ठिकाणची योजना एकाच ठेकेदाराला मिळाल्याने निविदा पद्धतीवरच शंका व्यक्त होऊ लागली आहे.या पठ्ठ्यानेही एकाही ठिकाणचे काम पूर्ण केलेले नाही. ग्रामस्थांना उलटसुलट माहिती देऊन मात्र दिशाभूल करीत आहेत, अशी माहिती सहजपूरचे गावकरी देत आहेत. या गावाला जवळपास 4 कोटी 41 लाख रुपयांचे काम होत आहे. यामध्ये जुन्याच योजनेच्या टाक्यांचा वापर करणार आहेत.
सहा किलोमिटर असलेल्या शेलारवाडी येथील तलावातून पाणी आणले जाणार आहे. सहा किलोमीटर पाण्याची मुख्य वितरिका आणि पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प एवढ्या दोनच बाबींसाठी ठेकेदाराला जवळपास साडेचार कोटी रुपयांचा निधी या विभागाने दिलेला आहे. ठेकेदाराला बक्कळ कमाई होईल अशा स्वरूपाचे अंदाजपत्रक करून अधिकार्यांनी ठेकेदाराला एकप्रकारे मदतच केल्याचे चित्र या योजनेचा अभ्यास करता समोर आल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात अशाच प्रकारे ठेकेदाराला जमेल तेवढी मदत या अधिकारीवर्गाकडून करण्याचा प्रयत्न होत असल्याने या तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजनेची दापोडी सोडल्यास सर्व 55 गावांची कामे सध्या अडचणीत आलेली आहेत.