शैक्षणिक धोरण; सुकाणू समितीकडून आढावा; पहिली सभा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात | पुढारी

शैक्षणिक धोरण; सुकाणू समितीकडून आढावा; पहिली सभा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या पहिल्या सभेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरुवात झाली. या सभेदरम्यान सर्व विद्यापीठातील शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुकाणू समितीच्या सभेचा पहिला दिवस सोमवारी (दि.23) पार पडला. या वेळी डॉ. करमळकर बोलत होते.

या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) कार्यकारिणी समिती अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. सजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, सिंबायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रत्येक विद्यापीठात शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कोणकोणती पावले उचलली आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत, यात प्रत्येक विद्यापीठात अंमलबजावणी समिती स्थापन झाली आहे का, त्याचे काम योग्य प्रकारे सुरू आहे का ? आर. डी. कुलकर्णी समितीच्या अहवालनुसार काय कार्यवाही झाली, या सगळ्याचा आढावा घेण्यात आला असल्याचे डॉ. करमळकर यांनी यावेळी सांगितले.

या सभेच्या दुसर्‍या दिवशी राज्याच्या विद्यापीठातील प्र- कुलगुरू व अधिष्ठाता यांच्या बैठकीचे आयोजन केले असून, या दरम्यान एकूणच एकसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही डॉ. करमळकर यांनी सांगितले. या चर्चेत विद्यापीठाचे
प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनीही आपले विचार व्यक्त केले.

आपण ‘शैक्षणिक धोरण 2020 प्लस’ धोरण राबवीत आहोत. या धोरणाची अंमलबजावणी करीत असताना ती मतांवर आधारित न राहता उपलब्ध माहितीनुसार केली जावी. लवचिकता आणि स्वातंत्र्य, हे यातील मुख्य घटक हवेत.

                                                          – डॉ. रघुनाथ माशेलकर,
                                                                ज्येष्ठ शास्त्रज्ञ

शैक्षणिक धोरणानिमित्ताने या शिक्षणात मुळापासून बदल करण्याची गरज आहे. भारताच्या मूळ शिक्षण पद्धतीचा पुन्हा अवलंब करीत विचारांची बैठक तयार करणारा समुदाय तयार करण्याची आता गरज आहे.

                                                                – डॉ. भूषण पटवर्धन,
                                         अध्यक्ष, राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक)

Back to top button