पुणे : खाद्यतेलाचा पुनर्वापर कराल, तर खबरदार! नियम तोडल्यास कारवाईचा प्रशासनाचा इशारा | पुढारी

पुणे : खाद्यतेलाचा पुनर्वापर कराल, तर खबरदार! नियम तोडल्यास कारवाईचा प्रशासनाचा इशारा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे गरजेचे आहे; तसेच अखाद्य वापरासाठी वापर करताना आवश्यक नोंदी ठेवणे बंधनकारक आहे,’ अशी तंबी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी बजावले आहे. अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यवसायाचे परवाना व नोंदणी) नियमन 2011, अन्न सुरक्षा व मानदे (विक्रीसाठी मनाई व निर्बंध) नियमन 2011 व अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे वेळोवेळी आदेश येतात, त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. पन्नास लिटरपेक्षा जास्त खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर करणार्‍या अन्न व्यावसायिकांनी खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबतच्या (आरयूसीओ) नोंदी जतन करून ठेवाव्यात.

उपयोगात आलेले खाद्यतेल अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली मान्यताप्राप्त संस्थेकडे देण्यात यावे व त्याबाबतच्या नोंदी जतन कराव्यात, अशी तरतूद आहे. उपयोगात आलेले अखाद्य खाद्यतेल जमा करणार्‍या मान्यताप्राप्त संस्था किंवा प्रतिनिधींनी हे तेल बायोडिझेल, साबण, वंगण आदींचे उत्पादन करण्यासाठी वापरावे. कोणत्याही परिस्थितीत याचा वापर खाद्यपदार्थ निर्मिती किंवा भेसळीकरिता करू नये; तसेच याबाबतचा आवश्यक तो अभिलेख जतन करावा. या प्रकरणी नियमांचे उल्लंघन आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुनर्वापर केलेले खाद्यतेल आरोग्यास, तसेच पर्यावरणास हानिकारक असते. अशा खाद्यतेलात टोटल पोलर कंपाउंड्स तयार होतात. यामुळे उच्च रक्तदाब, धमनीकाठीण्य, अल्झायमर, यकृताचे आजार आदी होतात. हे लक्षात घेऊन खाद्यतेलासंबंधी नियमांचे व तरतुदींचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

                                               शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Back to top button