जळगाव : एसटी सेवा सुरू करण्यासाठी दोन दिवसाचे अल्टिमेंटम : आ.चंद्रकांत पाटील
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप येत्या दोन दिवसात निकालात काढावा. अन्यथा मी स्वतः स्थानकातून बस चालवत बससेवा सुरु करणार आहे, असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शासनाने त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असल्या तरीही शासन विलनीकरणचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचारी संप सुरुच ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. आज सकाळी गारखेडा येथे ॲपे रिक्षा छोटा आणि मिनी ट्रक यात झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. याबाबत बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, एसटी आगरामधील कार्यक्रमाला गेलो असता, बस कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचे अल्टिमेटम दिले आहे. येथील एसटी बससेवा दोन दिवसात पूर्ववत न झाल्यास मी स्वतः बसस्थानकातून बस सुरू करणार असून ती बस जळगावपर्यंत नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत, त्यात बस कर्मचाऱ्यांचा संप असल्याने नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास करताना वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक होत आहे. यात प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
हेही वाचलं का?