नाशिक जिल्ह्याला गारपिटीने झोडपले, पिकं मातीमोल | पुढारी

नाशिक जिल्ह्याला गारपिटीने झोडपले, पिकं मातीमोल

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्याला रविवारी (दि.२६) वादळी वारे, विजांचा कडकाडाट, गारपिट आणि अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झाेडपून काढले. गारपिटीचा सर्वाधिक फटका निफाड व चांदवडला बसला असून अन्यही काही तालूक्यात गारा पडल्या. गारपिटीमुळे द्राक्षबागा, टोमॅटोचे पिकांना फटका बसला असून अन्य शेतीपिके धोक्यात आले. अवकाळीने निफाड व बागलाणला प्रत्येकी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून ठिकठिकाणी जनावरेही दगावली. पुढील दोन दिवस जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमीदाबाच्या पट्यामुळे राज्यावर अवकाळीचे संकट ऊभे ठाकले आहे. नाशिक जिल्ह्याही अवकाळीच्या तडाख्यातून सुटलेला नाही. नाशिकमध्ये पहाटेपासून ढगाळ हवामान निर्माण झाले होते. शहर व परिसरात दुपारी पावणे दोनच्या सुमारास विजांच्या कडकडाटा सह जोरदार पावसाला सुरवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नाशिककरांची त्रैधातिरपिट उडाली. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी बरसत होत्या. त्यामुळे नाशिककरांनी सुट्टीच्या प्लॅनवर फेरले गेले. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यत १३.६ मिमी पर्जन्याची नोंद झाली.

निफाड व चांदवड तालूक्यात अवकाळी पावसासोबतच गारपिटीने धुमाकुळ घातला. निफाडमध्ये २५ गावांना गारपिटीचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. चांदवड तालूक्याच्या पूर्व पट्यातील सहा ते सात गावांमध्ये गारपिटीमुळे शेतीचे माेठ्या नुकसान झाले आहे. जीवापाड जपलेल्या द्राक्ष बागा तसेच टोमॅटोचे पिक मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले आहेत.

सिन्नर, चांदवड, येवला, नांदगाव व इगतपूरी तालूक्यातील काही भागात जोरदार गारपिट झाली आहे. कांदा, भात, टोमॅटो पिकासह अन्य शेतीपिकांचे यामध्ये नुकसान झाल्याने बळीराजावर संकट कोसळले. दरम्यान, कमीदाबाचे क्षेत्राचा प्रभाव कायम असल्याने जिल्ह्याला सोमवारी (दि.२७) व मंग‌‌ळवारी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जीवित व आर्थिक हानी

अवकाळी व गारपिटीने जिल्ह्यात जीवित हानी व आर्थिक हानी झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनूसार भाटंबा साल्हेर (ता. बागलाण) येथे शेतात काम करताना वीज अंगावर पडल्याने सुरेश मुरलीधर ठाकरे (३५) यांचा मृत्यू झाला. तसेच पिंपळस (ता. निफाड) येथे गारपिटीच्या माऱ्याने सुभाष विठोबा मस्त्सगर (६५) हे गतप्राण झाले. याशिवाय मौजे फणसपाडा (सुरगाणा) येथील शेतकरी बनशे पवार यांचा बैल वीज पडून गतप्राण झाला. घोटी येथे शंकर निसरड यांचा गाेठा पडून म्हैस मयत पावली.

गोदा घाटेवर धावपळ

गंगापूर धरणातून जायकवाडीला सोडण्यात आलेल्या विसर्गाने आणि त्यातच परिसरातील नाल्यांमधून वाहून आलेल्या पाण्यामुळे गोदा घाटावर पाण्याच्या पातळीत सायंकाळ‌ी अचानक वाढ होऊन धावपळ उडाली. पर्यटकांची वाहने यावेळी पाण्यात अडकली. तर छोट्या मोठ्या विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले.

Back to top button