Tomatto : टोमॅटोने शेतकऱ्यांना केले लखपती, करोडपती; गावात लागले अभिनंदनाचे होर्डिंग  | पुढारी

Tomatto : टोमॅटोने शेतकऱ्यांना केले लखपती, करोडपती; गावात लागले अभिनंदनाचे होर्डिंग 

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ११० घर, १५०० लोकसंख्या आणि ६०० एकर विस्तीर्ण भाग असलेले धुळवड गाव. दर वर्षी या सिझनमध्ये गावातील बहुसंख्य शेतकरी टोमॅटोचे पीक घेत असतात. यावर्षी देखील ११० शेतकऱ्यापैकी १०५ शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. (Tomatto)

गेली अनेक वर्ष पावसाने टोमॅटोचे नुकसान होत होते. तर हवा तसा भाव मिळत नव्हता. मात्र या वर्षी टोमॅटो विक्रीतून अनेक शेतकरी लखपती, करोडपती झाल्याने गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या या आनंदात गावाचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी देखील सहभाग घेतला असून त्याकरिता गावात अभिनंदनाचे होर्डिंग लावण्यात आले आहे. आता हे होर्डिंग सोशल मिडियाच्या माध्यमातून वायरल झाल्याने जिल्हात चर्चेला ऊत आला आहे. (Tomatto)

दर वर्षी पेक्षा या वर्षी टोमॅटोच्या भावाने उच्चांक गाठल्याने ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. त्यांची तर एक प्रकारे लॉटरीच लागली. काही अक्षरशः लखपती तर काही करोडपती झाले. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून याच पार्श्वभूमीवर धुळवड गावी बॅनर लावण्यात आले आहे. या गावातील १५ शेतकरी ‘करोडपती’ तर ५२ शेतकऱ्यांना ५० लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.

दररोज या आकडेवारीत भर पडत आहे. गेली अनेक वर्षे शेतात मेहनत करुन काळया मातीत राब राब राबून देखील अनेकदा बळीराजाच्या हाताला काही लागत नव्हते. मात्र यंदा टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी राजा लखपती झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

त्यामुळे धुळवड गावात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी यांनी गावात बॅनर लावले आहे. हे बॅनर सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत असून ‘होय आम्ही करोडपती-लखपती धुळवडकर’ असा आशयाचा बॅनर लक्षवेधी ठरत असून आपण आतापर्यंत राजकीय पुढार्‍यांच्या वाढदिवसाचे तसेच विविध उपक्रमांचे होर्डिंग्ज बघत असतो. मात्र, आता धुळवडकरांच्या या यशाचे होर्डिंग पहिल्यांदा लागल्याने शेतकरी सुखावला आहे. (Tomatto)

मागील तीन-चार वर्षापासून टोमॅटोला शंभर ते दोनशे रुपये प्रति कॅरेट भाव मिळत होता मात्र गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा टोमॅटोला इतका भाव मिळाल्याने आम्ही देवाचे आणि निसर्गाचे आभार मानतो. दरवर्षी आम्ही राबराब राबवत असतो कसलीही परवा न करता कर्ज काढून उसनवारी करून धोका पत्करून आम्ही वर्षभर वेगवेगळ्या पिकांची लागवड करतो. मात्र कधी तरी अशी संधी येते. सुदैवाने ती संधी यावेळी आली व निसर्गाने साथ दिली. पाऊस खुप झाला नाही व पिकाचे नुकसान टळले. सर्व पिकांना असेच सुगीचे दिवस येवो हीच अपेक्षा.

– दादा हरी सांगळे, सरपंच, धुळवड

हेही वाचा; 

Back to top button