Accident : वेग करतोय घात, राज्यात दिवसाला ३५ जणांचा अपघाती मृत्यू | पुढारी

Accident : वेग करतोय घात, राज्यात दिवसाला ३५ जणांचा अपघाती मृत्यू

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात दि. १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२३ या कालावधीत ५५ हजार ५९ अपघातांमध्ये ५९ हजार ५४६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कालावधीत दर दिवसाला राज्यात सरासरी ३५ जणांनी अपघातात जीव गमावल्याचे वास्तव समोर आले आहे.

राज्यात गत ५३ महिन्यांमध्ये एक लाख ३५ हजार १०३ अपघातांची नोंद झाली आहे. त्यात ५५ हजार ५९ प्राणांतिक अपघातांचा समावेश आहे. तर ४९ हजार ७३१ अपघातांमध्ये ७७ हजार ३९३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे १९ हजार ३४८ अपघातांमध्ये ३३ हजार ५३१ जण किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. सर्वाधिक अपघाती मृत्यू २०२२ मध्ये झाले असून, त्यानंतर अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहे. प्रशस्त रस्त्यांवरून वाहने सुसाट चालत असल्याने तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. गेल्या वर्षात जानेवारी ते मेअखेर या कालावधीत झालेल्या अपघात व अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात चालू वर्षात सात टक्के घट झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

नाशिक ग्रामीणला सर्वाधिक मृत्यू

राज्यात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत सर्वाधिक अपघाती मृत्यू पुणे व नाशिक ग्रामीण/शहरी भाग मिळून झाले आहेत. त्यात नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक एक हजार ७७४, तर पुणे ग्रामीणमध्ये एक हजार ७२१ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात ३९२ आणि पुणे शहरात ५८० जणांनी अपघातांमध्ये प्राण गमावले आहेत.

वर्ष —- एकूण अपघात —- मृत्यू —- गंभीर जखमी —- किरकोळ जखमी

२०१९ —- ३२,९२५ —- १२,७८८ —- १९,१५२ —- ९,४७६

२०२० —- २४,९७१ —- ११,५६९ —- १३,९७१ —- ५,९४३

२०२१ —- २९,४७७ —- १३,५२८ —- १६,०७३ —- ६,९९८

२०२२ —- ३३,३८३ —- १५,२२४ —- १९,५४० —- ७,६९९

मे २०२३ पर्यंत —- १४,३४७ —- ५,८९७ —- ८,६५७ —- ३,४१५

हेही वाचा : 

Back to top button