नाशिक सिटीला दिले ‘स्मार्ट’ खड्ड्यांचे कोंदण | पुढारी

नाशिक सिटीला दिले ‘स्मार्ट’ खड्ड्यांचे कोंदण

नाशिक : प्रासंगिक : अंजली राऊत

नाशिक नगरीचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाल्यानंतर मोठा गाजावाजा करण्यात आला होता. आता स्मार्ट विकासकामे होणार आणि नाशिकनगरी स्मार्ट होणार, अशा अनेक अपेक्षा नाशिककरांनी उराशी बाळगल्या होत्या. परंतु, स्मार्ट सिटी कंपनीने नाशिकला ‘स्मार्ट’ करण्याच्या कामात रस्ते फोडून नाशिककरांच्या अपेक्षाच फोल ठरवल्या, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्मार्ट सिटीत नाशिकचा समावेश होऊन सहा वर्षे उलटली. मात्र, नाशिकनगरी काही स्मार्ट झाल्याचे दिसत नाही. स्मार्ट सिटी कंपनीने विविध कामांसाठी शहरभरात केलेल्या खोदकामामुळे निर्माण झालेल्यान स्मार्ट खड्ड्यांमधून नाशिककरांना ‘वाट’ काढावी लागत आहे. ‘कधी होणार स्मार्ट सिटी’ असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. ‘सुंदर नाशिक, हरित नाशिक’चे स्वप्न दाखवणार्‍या लोकप्रतिनिधींकडून दरवर्षी मतदारांची दिशाभूल करून मतांची पेटी वाचवण्याचे काम स्मार्ट सिटी राबविण्याच्या संकल्पेनेपासून सुरू आहे. नाशिककरही आशा ठेवून यंदा नाही, तर पुढच्या वर्षी तरी स्मार्टचा तोरा बघायला मिळेल, या प्रतीक्षेत आपल्या पसंतीच्या लोकप्रतिनिधींना निवडून देत आहेत. परंतु, नाशिककरांच्या प्रतिक्षेची हद्दच झाली. स्मार्ट सिटीच्या चकाचक रस्त्यावरून मिरवण्याच्या नादात त्यांना खड्डेमय रस्त्याच्या यातना सहन करत ‘वाट’ काढावी लागत आहे. ‘उदंड जाहले खड्डे’ म्हणत नागरिकांसह राजकीय मंडळींनीही केलेल्या तक्रारींनंतर खडबडून जागे झालेल्या मनपा आयुक्तांनी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले खरे. मात्र, आता आयुक्तांचेच आदेश म्हटल्यावर नाशिककरांची काळजी वाहणार्‍या ठेकेदारांनी भरपावसात डांबर, सिमेंट ओतून खड्डे बुजवण्याची ‘मोहीम’ एकदाची राबवली. भले पुन्हा खड्डे बुजवण्याची वेळ आली, तरी चालेल, ही तयारीही त्यांनी ठेवली आणि पुन्हा संततधारेमुळे खड्डे निर्माण झाले. आर्थिक विवंचनेत असलेली मनपाही या खड्ड्यांचे करायचे काय? अशा पेचात आहे. नाशिककरांनाही महापालिकेच्या आर्थिक अडचणीची जाण झाल्याने तेही मनपाला सहाय्य करत दररोज खड्डेमय यातना सहन करत आहेत.

‘स्मार्ट वर्क’ मधून अपेक्षांचे ओझे हलके व्हावे

‘माझे नाशिक माझी जबाबदारी’ म्हणत महापालिकेला सहयोग देत आहेत. त्यातही फोन उचलला नाही म्हणून समोरच्याला वाईट वाटायला नको, याकरिता दुचाकीवर खड्ड्यांतून मार्ग काढताना मोबाइलवर बोलण्याचे कसब पार पाडत आहेत. अशा वाहनधारकांना तर मनपाने पुरस्कारच द्यायला हवा. यावरून नाशिककर सर्वसामान्यांपासून तर लोकप्रतिनिधींचे का असेना, मन जपणारे आणि वेळोवळी अ‍ॅडजस्टमेंट, सहकार्य करणारे आहेत. हे अधिक सांगायला नको. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने निदान यावर्षी तरी ‘स्मार्ट वर्क’ करून नाशिककरांच्या अपेक्षांचे ओझे हलके करावे, हे सांगणे महत्त्वाचे ठरत आहे.

हेही वाचा:

Back to top button