Health Tips : ढगाळ वातावरणामुळे वाढले आजारपण: अशी घ्या आरोग्याची काळजी | पुढारी

Health Tips : ढगाळ वातावरणामुळे वाढले आजारपण: अशी घ्या आरोग्याची काळजी

गजानन चौकटे

गेवराई :  मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरण, मध्येच कोसळणारा रिमझिम पाऊस अशा स्थितीशी जुळवून घेणे अनेकांना अडचणीचे ठरत आहे. ऋतुबदलाचा मानवी शरीरावर तत्काळ परिणाम होतो. त्यामुळे सध्या ताप, सर्दी-खोकला आदी विकार बळावण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, अशा बदलत्या ऋतुमानात उद्भवणाऱ्या आरोग्यासंदर्भातील समस्यांवर पुरेशी दक्षता हाच रामबाण उपाय ठरू शकतो, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. Health Tips

सध्या अचानक निर्माण झालेले ढगाळ वातावरण आरोग्यास अपायकारक ठरू शकणारे आहे. अशा वातावरणात व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. वातावरण बदलामुळे खोकला, सर्दी, अस्थमा बळावण्यासह गंभीर आजारांचे विषाणू पसरण्यासही भीती असते . संसर्गजन्य आजारांमुळे रुग्णसंख्याही वाढू शकते. या बदलाशी जुळवून घेण्यास शरीराला काहीसा वेळ लागतो. या समस्येत डासांमुळेदेखील भर पडताना दिसते. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे तत्काळ नष्ट करण्यासह आरोग्याच्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचा सल्ला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय गोंदीकर यांनी दिला. Health Tips

सर्दी, खोकला, घशाचे विविध विकार, ताप, डोकेदुखी, उलट्या, जुलाब यांसारखे आजार झाल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे फायदेशीर ठरू शकेल. अनेक नागरिक घरगुती उपाय करण्यावर भर देतात. मात्र, अशावेळी कुठलीही रिस्क घेणे चुकीचे ठरू शकते. आजारी असताना तोंडाला रुमाल बांधावा, लहान मुले आजारी असल्यास योग्य खबरदारी घ्यावी. त्यांना शाळेमध्ये पाठवू नये​, अशी सूचनाही तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला, गर्भवती महिला यांच्यावर अशा बदलत्या वातावरणाचा तत्काळ परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेतल्यास आरोग्याच्या समस्यांवर मात करणे शक्य होईल, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे

Health Tips : ज्येष्ठ व्यक्तींनी धूर, धूळ टाळावी

वातावरण बदलामुळे वयोवृद्धांचे संधिवातासारखे आजार बळावतात. त्वचा कोरडी पडते आणि जुनाट गुडघेदुखी व पूर्वीपासून असलेले आजार बळावतात. दमा असल्यास दम्याचा वेग तीव्र होतो. या रुग्णांनी धूर, धूळ असणारे रस्ते टाळावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक औषधी तेलांचा मसाज करून पोटातूनही औषधे घ्यावीत. मणक्याच्या विकारांमुळे मान, कंबरदुखी असल्यास काही व्यायाम, योगासने, औषधी तेलाचा मसाज, काढा घेणे आदी उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावेत. गरम पाण्याने आंघोळ करावी. सुंठ व ओवायुक्त पाणी दिवसभरात थोडेथोडे पिल्यास आराम पडू शकतो.

 महिला व गर्भवतींनी  काळजी घ्यावी

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडून ओठ फाटणे, मुरुमांत वाढ, डोक्‍यात कोंडा वाढणे, त्वचा उलणे, पायाला भेगा पडणे अशा प्रकारच्या त्वचाविकारांना अनेक महिलांना सामोरे जावे लागते. परिणामी, फंगल इन्फेक्‍शन वाढते. चिखल्या होणे, हाताच्या बोटांच्या फटीतील त्वचेची आग होणे, पुरळ उठणे असे विकार वाढू शकतात. या विकारांवर नियंत्रणासाठी अंगावर ओले कपडे फार काळ ठेवू नयेत. सुती कपड्यांचा वापर करावा. अँटिफंगल पावडरचा वापर करावा. आंघोळीनंतर मॉइश्चरायझर किंवा व्हॅसलिनचा वापर करावा. सैल सुती कपडे वापरावेत. बाहेरचे खाद्यपदार्थ, आंबट व तळलेले पदार्थ टाळावेत. कोणत्याही विकारासंदर्भात तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गर्भवती महिलांनी अशा काळात स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी, तसेच बाळाच्या वाढीसाठी हिरव्या पालेभाज्या, फळे व ज्युसचा अधिक वापर करावा. विविध प्रकारचे सूप या काळात लाभदायी ठरतात. मुख्य म्हणजे जेवणाची वेळ पाळत पुरेसा सकस आहार घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गर्भावस्थेतील व्यायाम व योगासनेही उपयुक्त ठरू शकतात.

– डॉ.  प्रदीप राठोड,  स्त्री रोगतज्ज्ञ गेवराई

लहान मुलांना जपा

लहान मुलांमध्ये या दिवसांत ताप, थंडी, सर्दी, खोकला यांसारखे आजार बळावतात. त्यामुळे आईस्क्रीम, जंकफूड, तळलेले पदार्थ, तसेच प्रीझर्व्हेटिव्ह फूड (डबाबंद, खूप दिवसांचे) मुलांना खायला देणे टाळावे. आयुर्वेदिक उपचारांनुसार लहान मुलांना तुळस व आल्याचा रस मधात दिल्यास फायदा होऊ शकतो. याशिवाय नियमित कोमट पाणी पिण्यास द्यावे. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त असलेली संत्रा, आवळा, मोसंबी आदी फळे खाण्यास द्यावीत. नियमित च्यवनप्राश सेवन करण्यास द्यावे. अर्थातच सर्व बाबी डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे महत्त्वाचे आहे.

– डॉ.  राम दातार गेवराई

हेही वाचा 

Back to top button