हिंगोली : जन्मदात्या वडिलांचा मुलांनीच केला खून; पुरावा नष्ट करण्यापूर्वीच पोलीस घटनास्थळी | पुढारी

हिंगोली : जन्मदात्या वडिलांचा मुलांनीच केला खून; पुरावा नष्ट करण्यापूर्वीच पोलीस घटनास्थळी

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : पानकनेरगाव येथे जुन्या वादातून दोन मुलांनी जन्मदेत्या वडिलांना मारहाण करुन खून केला. सेनगाव तालुक्यातील ही घटना शनिवारी 4 जून रोजी घडली. याप्रकरणात पुरावा नष्ट करण्यापूर्वीच पोलीस पोहोचल्याने खुनाचा उलगडा झाला. या प्रकरणी दोन मुलांवर सोमवारी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय आबाराव देशमुख असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील संजय आबाराव देशमुख व त्यांची दोन्ही मुले निखिल देशमुख, गजानन देशमुख यांच्यात मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरुन वाद सुरू होता. त्यातून छोट्या-मोठ्या कुरबुरी होत होत्या. म्हणून हा खून केला असावा असे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान शनिवारी रात्री साडेसात वाजता निखील व गजानन या दोघांनी त्यांचे वडील संजय देशमुख यांना काठीने मारहाण केली. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रविवारी दोन्ही मुलांनी संजय देशमुख यांना उपचारासाठी रिसोड येथे दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वाशिम येथे हलवले. प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी अकोला येथील हॅास्पिटल मध्य जाण्याचा सल्ला दिला. मात्र दोन्ही मुलांनी त्यांना अकोला येथे न नेता रात्री पानकनेरगाव येथे आणले. मात्र रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, खूनाची घटना लपवण्यासाठी दोन्ही मुलांनी रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अंत्यविधीची तयारी केली. मात्र या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिक्षा लोकडे, जमादार अनिल भारती यांच्या पथकाने रात्री पानकनेरगाव गाठले. पोलिसांनी मृत संजय देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेऊन कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. यामध्ये मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

शिवाजी आबाराव देशमुख यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी निखिल व गजानन या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक भोईटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा

 

Back to top button