‘राजाराम’मध्ये जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देणार : सतेज पाटील | पुढारी

‘राजाराम’मध्ये जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देणार : सतेज पाटील

कोल्हापूर : गेल्या 28 वर्षांत जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत राजाराम कारखान्याकडून उसाला 200 रुपये कमी दर मिळाल्याने सभासदांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या उसाला योग्य दर मिळणे महत्त्वाचे आहे. राजाराममध्ये इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देणार असून या निडणुकीत सभासदांनी परिवर्तन आघाडीला भक्कम साथ द्या, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

राजर्षी छ. शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने धामोड (ता. राधानगरी) येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. आ. पाटील पुढे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे अर्थकारण त्यांनी पिकवलेल्या उसाच्या दरावर अवलंबून आहे. राजाराम कारखाना निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने सभासदांशी संवाद साधताना उसाला योग्य दर मिळत नसल्याची व्यथा शेतकर्‍यांनी मांडली. आमच्या उसालारिकव्हरीही चांगली आहे, ऊस वाहतूक, तोडणी खर्चही कमी आहे, असे असतानाही राजाराम कारखान्याने आम्हाला आजपर्यंत 200 रुपये कमी दर दिल्याचे सभासद पोटतिडकीने सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी, सभासदांच्या हिताला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील. ऊस उत्पादकांना चांगला दर देऊन त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य देऊ, असे त्यांनी सांगितले.

संजय ढवण म्हणाले, महाडिकांनी आजपर्यंत काटामारीचा धंदा करून सभासदाची आर्थिक लूट केली. यासाठीच त्याना पुन्हा सत्ता हवी आहे; मात्र यावेळी हे प्रयत्न हाणून पाडूया. अशोक साळुंखे म्हणाले, तुळशी खोर्‍याने एकदा शब्द दिला की तो मागे घेत नाही. त्यामुळे यावेळी कारखान्यात परिवर्तन अटळ आहे. सभासदांचा हा रोष मतपेटीतून दिसून येईल.
सभासद रघू धनवडे म्हणाले, महाडिकांनी सभासदांचा सोडाच पण संचालकांनाही नेहमी अपमानास्पद वागणूक दिली.
कारखान्याचे माजी संचालक एल. एस. पाटील, गोकुळ संचालक बाबासो चौगले, प्रा. किसन चौगले, मारुती तामकर, विलास पाटील, अशोक साळोखे, एस. जी. खडके, नामदेव पाटील, के. जी. लाड, धोंडिराम किरुळकर, जीवन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, संदीप मगर, महादेव धनवडे, संजय ढवण, शशिकांत खडके, शामराव देसाई यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button