‘अलमट्टी’ची उंची वाढविण्याचा कर्नाटकचा प्रयत्न हाणून पाडू : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर | पुढारी

‘अलमट्टी’ची उंची वाढविण्याचा कर्नाटकचा प्रयत्न हाणून पाडू : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याची चर्चा सुरू आहे; मात्र शासकीय पातळीवर हालचाली सुरू नाहीत. कर्नाटक सरकारने याबाबत महाराष्ट्र शासनाला अवगत केले नाही अथवा राज्य सरकारशी कोणतीही चर्चा केली नाही. अलमट्टीची उंची एकतर्फी वाढवण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्न हाणून पाडला जाईल. त्याला आपला विरोध राहील. कर्नाटक शासनाच्या या भूमिकेबाबत आपण लवकरच उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

ते म्हणाले, अलमट्टी धरण बांधल्यापासून 2005 मध्ये पहिला महापूर आला. कर्नाटक शासनाने अलमट्टीमुळे पूर येत नाही, असा कागदोपत्री दावा केला असला तरी याचा पुन्हा सर्व्हे होणे गरजेचे आहे. सध्या अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळेच आपल्याकडे दहा ते पंधरा दिवस पाणी तुंबून राहते. त्यानंतर 2019 आणि 2021 या महापुराची स्थिती पाहिल्यास सुमारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून यामध्ये शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांचे मोठे नुकसान झाले आहे. कर्नाटकच्या या निर्णयाने त्यांच्या राज्यातील सुमारे 62 गावांना लाभ होईल, असा दावा कर्नाटक सरकारच्या वतीने करण्यात येत असला तरी सांगली आणि कोल्हापुरातील 30 मोठी गावे व सुमारे 110 लहान गावे कायमची विस्थापित होऊ शकतात. सांगली महापालिकेच्या आठ लाख लोकसंख्येपैकी सुमारे 5 लाख नागरिक कायमचे विस्थापित होऊ शकतात. याबरोबरच लाखो हेक्टरमधील बागायती शेतीचे क्षेत्र नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात 2019 साली आलेला महापूर हा सर्वाधिक मोठा ठरला. त्यानंतर 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे तुलनेने तितकेच नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला आहे. शिरोळ तालुक्यात या महापुरात अनेक घरे जमीनदोस्त झाली त्यापैकी काही घरांची बांधकामे पूर्ण झाली मात्र, अनेक गरीब कुटुंबांची घरे पडलेल्या अवस्थेतच आहेत. प्रत्येक महापुराच्या वेळी नुकसानभरपाई म्हणून शासनाकडून पूरग्रस्तांना मदत होत असते, पण नुकसान इतके असते की पूरग्रस्तांना पुन्हा नव्याने उभे राहताना यातना सोसाव्या लागतात. त्यामुळे महापुराला कारणीभूत ठरत असलेल्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास राज्य शासनाच्या वतीने विरोध करून शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फिजिकल मॉडेल तयार करणे गरजेचे 

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 12 ते 15 फुटांच्या आसपास असते. मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत हीच पाणीपातळी 35 ते 40 फुटांपर्यंत जाते आणि अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग केला गेला नाही तर ही पातळी 60 फुटांपर्यंत जाऊन पोहोचते. जर महापुर सद़ृश परिस्थिती निर्माण झालीच तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 600 गावांत महापूर येऊन कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कृष्णा नदीसारख्या गुंतागुंतीच्या व्यवस्थेत प्रत्यक्ष जमिनीवर काय घडते याचे फिजिकल मॉडेल तयार करणे गरजेचे असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले.

Back to top button