नदी काठ उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल | पुढारी

नदी काठ उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल

शिरटी; कुणाल कांबळे : महापुराचा फटका : गेल्या महिन्यात आलेल्या प्रलयंकारी महापुरामुळे कृष्णा नदीकाठी असणाऱ्या शेतीचे कडे मोठ्या प्रमाणात ढासळलेले आहेत. याचा मोठा फटका नदीकाठी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे.

महापुराचा फटका 

यामध्ये ८ ते १० गुंठ्याहून अधिक क्षेत्र वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतीमधून मिळणाऱ्या उत्पनावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला नुकसान भरपाई देऊन मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांमधून होत आहे.

सन २००५, २००६, साली आलेल्या महापुरामुळे नदीचे काठ काही प्रमाणात ढासळले होते.

त्यानंतर दोन वर्षांपूर्वी आलेल्या २०१९ च्या आणि आत्ता २०२१ साली आलेल्या प्रलयंकारी महापुरामुळे शिरटी, घालवाड, कुटवाड, कनवाड, हसुर, गौरवाड

या परिसरातील कृष्णा नदीकाठी असणाऱ्या शेतीचे काठ मोठ्या प्रमाणात ढासळल्याने क्षेत्र कमी झाले आहे.

यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नदीपात्रात उतरून जाणेदेखील अवघड बनले आहे.

घालवाड येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी लक्ष्मण तिटवे यांची २२ गुंठे शेती नदीपत्रालगत आहे. मात्र गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे उभा ४० ते ५० फूट इतका उंच शेतीचा कडा ढासळल्याने ८ ते १० गुंठे क्षेत्र वाहून गेले आहे.

तसेच शेतात असणारी आंबा, जांभळाची सात झाडे, विद्युत मोटरी, ड्रीप पाईप असे साहित्य वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. काठ ढासळून जमिनी कातरल्याने उर्वरित क्षेत्रातच शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

ढासळलेल्या कड्यांमुळे शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन घटणार आहे. तसेच भविष्यात देखील धोका उदभवण्याची शक्यता आहे.

नदीचे पात्र रुंद झाले असून बदलण्याची शक्यता आहे. नदीपात्राच्या शेतीलगत १० – १२ दिवस महापुरापुराचे पाणी राहिले होते. त्यामुळे विजेचे खांब कोसळले आहेत, विद्युत मोटरी वाहून गेल्या आहेत.

त्यामुळे शिरटी, हसुर, कनवाड, घालवाड, कुटवाड येथील शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

शेतकरी प्रतिक्रिया :

माझे नदी पात्रालागत २२ गुंठे क्षेत्र आहे. मात्र २०२१ च्या महापुरात मोठ्या प्रमाणात नदीकाठ ढासळून ८ ते १० गुंठे क्षेत्र वाहून गेले आहे.

त्याबरोबर आंबा व जांभळीच्या ६ झाडे व दोन विद्युत मोटर, ड्रीप पाईप असे हे सर्व पाण्याबरोबर वाहून गेले आहे. तसेच २०१९ च्या महापुरातदेखील येथे असणाऱ्या पॉलिहाऊसचा सुफडासाफ झाला आहे.

मात्र शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. शासनाने आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मदत घ्यावी अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.

शिवाजी लक्ष्मण तिटवे
अल्पभूधारक शेतकरी घालवाड..

Back to top button